मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:56 AM2020-06-04T05:56:07+5:302020-06-04T05:56:22+5:30

२५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी केले स्थलांतर

Chakwa to Mumbai; speedy wind, rain, land fall | मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

googlenewsNext

सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतही ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा दुष्परिणाम फारसा पाहायला मिळाला नाही. सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून विविध भागांतून सुमारे २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.


वाऱ्याच्या वेगाने बुधवारी अलिबागला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईच्या समुद्रकिनाºयावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच वारेही वेगाने वाहत होते. सकाळपासून सुरू असलेला पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला आणि मुंबईकरांना धडकी भरली. सखल भागात विशेषत: जे नागरिक समुद्रकिनारी राहतात त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पावले उचलली होती. यात प्रामुख्याने वर्सोवा आणि वरळी येथील रहिवाशांचा समावेश होता. कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या किनारी असलेल्या क्रांतिनगर येथील रहिवाशांनाही लगतच्या पालिकेच्या शाळेत हलविण्यात आले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांतून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.


दुपारी पावसाचा आणि वाºयाचा वेग वाढल्याने ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दल सज्ज होते. ६ चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक, रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात होते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एडीआरएफ) एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईतील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवून होत्या. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी, मालाड आणि बोरीवलीचा समावेश होता. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारांहून अधिक कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.
धोकादायक इमारतींची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कोसळलेल्या झाडांना तातडीने हटविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यासाठी ९६ पथके तैनात होती. अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.

ओडिशा सरकारसोबत सल्लामसलत
ओडिशा सरकारला वादळाशी संबंधित विविध आपत्तींचा सामना करण्याचा असलेला अनुभव लक्षात घेता, त्यांच्याशी प्रशासनाने सल्लामसलत केली. अशा आपत्तींमध्ये रस्त्यांवर कोसळलेली झाडे तातडीने हटविणे आवश्यक आहेत अन्यथा मदतकार्यावर परिणाम होऊ शकतो, हा सल्ला लक्षात घेऊन पालिकेसह इतर यंत्रणांनाही या कामामध्ये गरज पडल्यास सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची विनंती केली होती.

३० हजार नागरिकांनी स्वत:हून
केले स्थलांतर

खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा नागरिकांच्या तात्पुरत्या निवाºयासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सुमारे ३० हजार नागरिकांनी स्थलांतर केले. याशिवाय दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरूनही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

Web Title: Chakwa to Mumbai; speedy wind, rain, land fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.