"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:54 IST2025-12-21T15:52:47+5:302025-12-21T15:54:42+5:30
चंद्रपुरात काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावत जोरदार पुनरागमन केले

"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Sudhir mungantiwar on Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील २८८ नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या आज जाहीर झालेल्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मरगळ आलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत अनपेक्षित मुसंडी मारली असून, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. विशेषतः विदर्भात काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावत जोरदार पुनरागमन केले आहे.
विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेस संपली, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना या निकालाने चपराक दिली आहे. राज्यातील २८८ पैकी ३४ जागांवर आघाडी घेत काँग्रेसने महाविकास आघाडीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकीकडे महायुतीतील शिवसेना (शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे तिन्ही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने एकजूट दाखवत ही निवडणूक लढवली, ज्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे दिसत आहे.
चंद्रपुरात वडेट्टीवारांचा करिश्मा
विदर्भातील निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच चंद्रपुरात भाजपला धूळ चारली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ११ पैकी तब्बल ८ जागांवर काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला आहे. याउलट, सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या १-१ जागेवर समाधान मानावे लागले आहे. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. वडेट्टीवारांच्या या विजयामुळे चंद्रपुरात काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची स्वपक्षावरच नाराजी
या पराभवानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्रिपद न मिळाल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवारांच्या या विधानामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
"या पराभवाचे आम्हाला चिंतन करावे लागेल. काँग्रेसने वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता केलं. दुसरीकडे, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद दिलं नाही, मला तर दिलच नाही पण कोणालाही मंत्रिपद दिलं नाही. ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.