भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:39 IST2019-06-19T12:25:27+5:302019-06-19T12:39:21+5:30

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

BJP's new formula for alliance with Shiv Sena | भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर सर्वकाही व्यवस्थीत झालं असा समज महाराष्ट्रातील जनतेत गेला होता. मागील पाच वर्षांत एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेना-भाजपने विधानसभेसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फॉर्म्युला देखील ठरला होता. मात्र भाजपच्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला धक्का बसणार असून त्यामुळे शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला १४४-१४४ जागांचा फॉर्म्युला भाजप-शिवसेना यांच्यात निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर भाजपकडून घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी फॉर्म्युला १३५-१३५ असा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून उर्वरित १८ जागा घटक पक्षांना देण्यास भाजप उत्सुक आहे. दुसरीकडे शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद असं धोरण ठरलं असलं तरी भाजप नेत्यांच्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या स्वप्नाला सुरंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या १८ जागा या भाजपच्या चिन्हावर लढवाव्या अस भाजपच म्हणणं आहे. त्यामुळे सहाजिकच १३५-१३५ या फॉर्म्युल्याला खीळ बसणार असून हा फॉर्म्युला १३५-१५३ असा होणार आहे. या दाव्यामुळे युतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी घटक पक्षांच्या अनेक उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्याचे कारणही तसच असून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपचाच हवा आहे.

Web Title: BJP's new formula for alliance with Shiv Sena