घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संभाजीराजेंना फसवलं - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:44 IST2022-05-30T14:43:13+5:302022-05-30T14:44:34+5:30
Sanjay Raut : घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संभाजीराजेंना फसवलं - संजय राऊत
मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचे असतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तसेच, घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
संभाजी छत्रपती यांना भाजपकडून कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपला स्वतःचा उमेदवार टाकायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे. पण यासाठी संजाभीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्याकडे लोकशाही आहे व प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, परंतु महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा प्रकारच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारच सुद्धा बारीक लक्ष आहे. एवढंच मी सांगू शकेन, असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही आमचा उमेदवार म्हणून संजय पवार यांना उतरवले आहे. मला आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण खात्री आहे की, जेवढी मतं हवीत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आणि आघाडीतील इतर उमेदवारी देखील विजय होतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीवर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केले. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीबाबत मी बोलणार नाही. कारण माझ्यापर्यंत कोणी येणार नाही. कोणत्या विषयावर नाराजी आहे, काय आहे? ते त्यांचे हायकमांड ठरवतील आणि सांगतील. महाविकास आघाडीतील धुसफूस यावरुन होणाऱ्या आरोपांबाबत काहीच तथ्य वाटत नाही. जर तसे काही असेल तर मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींशी फोनवरुन संवाद साधतात. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्यात उत्तम संवाद आहे,असे संजय राऊत म्हणाले.
तसेच, काँग्रेसने इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांची चांगली व्यवस्था आहे. मात्र, काँग्रेसने महाराष्ट्रातून कोणीतरी स्थानिक उमेदवार दिला, असता तर नक्कीच चांगली बळकटी पक्षाला मिळाली असती, मला वाटते की काँग्रेसने देशाचा विचार केलेला आहे व इतर राज्यांचा विचार केलेला आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.