मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने विजयासाठी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला - शिवसेना आमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:30 IST2017-08-21T15:53:41+5:302017-08-21T18:30:46+5:30
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये भाजपाने विजयासाठी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला - शिवसेना आमदार
ठाणे, दि. 21 - मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही अशी सारवासारव शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. पराभवानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या ओवळा-माजीपाडा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मीरा-भाईंदरमध्ये येतो.
मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागामध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या असा दावा त्यांनी केला. भाजपाची राजकीय ताकत कमी पडल्याने त्यांनी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला असा आरोप त्यांनी केला. प्रचार संपल्यानंतर भाजपाने जैन धर्मगुरुंना प्रचारात उतरवल आणि त्यांचा संदेश जैन-गुजराथी समाजापर्यंत पोहोचवला असे सरनाईक म्हणाले.
आता तरी तुमचा अहंकार संपणार का ?
उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. मीरा-भाईंदरमधील मतदारांनी नरेंद्र मोदींच्या माफीया हटाव आणि मुख्यमंत्र्यांच्या विकासला मत दिल आहे.
मुंबईत 84 जागा जिंकल्यानंतरही शिवसेनेची माफीयागिरी संपली नव्हती. मीरा भाईंदरचा निकाल हा शिवसेनेसाठी सणसणीत चपराक आहे. शिवसेना नेत्यांच्या अहंकाराला मतदारांनी जागा दाखवली आहे असे किरीट सोमय्या म्हणाले. मीरा-भाईंदरच्या निकालानंतर तरी बांद्रा सुप्रीमो वास्तव स्वीकारुन पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणार का ? असे टि्वट सोमय्या यांनी केले आहे.
"लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले
मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपाचा दणदणीत विजय करून स्वीकारले, असं म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. तसेच या विजयाबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
मुंबईत दमछाक उडाली, पालघर, कल्याण-डोंबिवलीत आमच्यामुळेच अडले, पनवेलमध्ये भोपळाही फोडता आला नाही. तर मीरा-भाईंदरमध्ये पाचव्यांदा मतदारांनी उघडे पाडले. काहींच्या ताकदीचा अस्सली चेहरा आता समोर आला असेल, असं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे.