“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 10:15 AM2023-08-30T10:15:41+5:302023-08-30T10:16:27+5:30

Maharashtra Politics: संजय राऊतांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरुन देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे.

bjp mla nitesh rane wrote letter to maharashtra ats chief sadanand date and demand to take action on sanjay raut | “संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र

“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका होताना दिसत आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराचे उद्घाटन आणि दंगलींबाबत मोठा दावा केला. यावरून आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी थेट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (ATS) सदानंद दाते यांना पत्र लिहिले असून, संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

नितेश राणे आपल्या पत्रात म्हणतात की, अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्र जन्मभूमीचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेतून शांततेत सोडवला गेला आणि आता मंदिर उभारणीचा संकल्पही सर्व जाती धर्माच्या सहकार्याने आनंदाने पुर्णत्वास जात आहे. लोकार्पण सोहळा  तारीख  जशी जशी जवळ येतेय तसा देशात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. अशावेळेस वारंवार सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करत आहेत. त्यात सर्वात अग्रक्रमी राज्यसभेचे खासदार व  सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत हे मे २०२२ पासून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील अशा वारंवार बातम्या माध्यमातून पसरवत आहेत. 

संजय राऊत यांची देशविरोधक संघटनेशी जवळीक असावी 

त्यांच्या विधानानंतरच महाराष्ट्रात अचानक काही लोकांनी औंरगजेबाचे फोटो स्टेटस म्हणूनही ठेवले आणि त्यामुळे काही भागात दंगलीसुद्धा घडल्या. त्यामुळेच दि.२८ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी माध्यमांपुढे विधान केले की, “राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावले जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवले गेलेय असे म्हटले जातेय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल.” त्यामुळेच त्यांचे हे विधान मला चिंतेत टाकणारे आहे. मला खात्री आहे की, देशविरोधक संघटनेशी त्यांची जवळीक असावी आणि भारत देशाविरूद्ध संभाव्य कटकारस्थान रचल्या जाणाऱ्या षडयंत्रांचा ते भाग असावेत म्हणूनच त्यांना संभाव्य दंगलीची एवढी सखोल माहिती आहे, असा दावा नितेश राणे यांनी पत्रात केला आहे. 

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी

संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि पाकिस्तानची तारीफ करणाऱ्या वृत्तींना ते आपला आदर्श समजतात. माझी आपणास विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करावी आणि आवश्यकता वाटल्यास  न्यायलयीन प्रक्रियेतून त्यांची नार्को टेस्टही करावी जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, असे नितेश राणे यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


 

Web Title: bjp mla nitesh rane wrote letter to maharashtra ats chief sadanand date and demand to take action on sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.