Maharashtra Politics: “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पुढील दहा ते पंधरा वर्ष हटत नाही”; भाजप नेत्याला ठाम विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:00 IST2022-10-28T11:59:17+5:302022-10-28T12:00:10+5:30
Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री असल्याचा विश्वास भाजप नेत्याने व्यक्त केला आहे.

Maharashtra Politics: “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पुढील दहा ते पंधरा वर्ष हटत नाही”; भाजप नेत्याला ठाम विश्वास!
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर झळकावण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही अजितदादा मुख्यमंत्री झाले, तर आनंदच होईल. सर्वांचीही तशी इच्छा असल्याचे म्हटले होते. यावरून भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी टोला लगावला असून, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पुढील दहा ते पंधरा वर्ष तरी हटत नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ना होईल हा दुसरा भाग आहे. परंतु त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचे नाव पहिले निश्चित करावे. कुटुंबामध्ये कोणाला ते नेतृत्व देताय आणि मग त्यावरती कारवाई करावी. पक्ष जे चालवतात त्यांच्या तोंडून तो निर्णय आला तर त्यावर मी भाष्य करेन, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
अजित पवार ज्येष्ठ नेते, त्यांचे काम अतिशय चांगले
पुढे बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, राहिला प्रश्न अजित पवार यांच्या नेतृत्वाचा, ते या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे काम अतिशय चांगला आहे. त्यांनी नेतृत्व करावे किंवा नाही करावे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार असून ते पुढील दहा ते पंधरा वर्षे हटत नाही. ज्यांना पदे वाटून घ्यायची आहेत. त्यांनी घरात बसून आपापसामध्ये वाटून घ्यावी, असा खोचक टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही, पद गेल्यावर दौरे करतायत
ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला आहे, अशी खोचक टीका सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणे याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"