Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: कर्नाटकातीलकाँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकरांचे राज्यासाठी कोणतेही योगदान नव्हते, असा दावा कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये बसवराज बोम्मई यांच्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपाने आक्रमक होत काँग्रेसवर टीका केली आहे.
या मुद्द्यावरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत
सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही, या शब्दांत बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, काँग्रेसला या निर्णयाची किंमत चुकवावी लागेल. काँग्रेस सरकारकडून आणखी काही अपेक्षाच केली जाऊ शकत नाही. काँग्रेस सरकार टिपू सुलतानची स्तुती करते आणि वीर सावकरांविषयी अशी भूमिका घेते. वीर सावकर यांच्या तुलनेत नेहरुंचे योगदान काय, असा सवाल रणजित सावकर यांनी केला आहे. दुसरीकडे, वीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता आणि ब्रिटिशांची माफी मागितली होती, या आपल्या भूमिकेवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार ठाम असल्याची माहिती देण्यात आली आहे.