Atul Bhatkhalkar : "जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 19:40 IST2023-05-06T19:30:50+5:302023-05-06T19:40:47+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.

Atul Bhatkhalkar : "जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचं रत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत झालं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. दरम्यान, यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा, मग पेटवापेटवीची भाषा करा…" असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा, मग पेटवापेटवीची भाषा करा… pic.twitter.com/owZL9MmX8v
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 6, 2023
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी प्रकल्पासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं. हुकूमशाहीच्या माध्यमातून हा प्रकल्प लादू नका. राज्य सरकारने हुकूमशाही करून हा रिफायनरी प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही महाराष्ट्र पेटवू. आज मी इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या आणि रिफायनरीचं समर्थन करून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि गुजरातच्या वाट्याला रांगोळी, असं होता कामा नये अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील सड्यावर असलेल्या कातळशिल्पांचीही पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, जसं मी या प्रकल्पाबाबत पत्र दिलं होतं. तसंच पत्र मी या कातळशिल्पाबाबतही दिलं होतं. या कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी मागणी मी केली होती. या कातळशिल्पांबाबत मला माहिती होती. मात्र या रिफायनरीच्या जागेत ही कातळशिल्प येतात हे मला हल्लीच समजलं. हा अमूल्य ठेवा आहे. त्याचं जतन व्हायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.