NCP Ajit Pawar Group News: शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर त्यांचे विचार कधी आपण विसरू शकत नाही. हा देश अनेक धर्म, पंथ, भाषांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एक संघ राहिलेला आहे, हे स्पष्ट करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार डी. एस. अहिरे, सिंदखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनिल नेरकर, काँग्रेस किसान सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, धुळे महानगरपालिकेचे माजी सभापती हरिश्चंद्र वाघ, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अबीद पठाण आदी प्रमुख नेत्यांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
आमच्या पक्षात नवा-जुना वाद नाही
आमच्या पक्षात नवा-जुना वाद नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व आहे. ज्याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देताना समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. सन २०२९ मध्ये आपल्या महाराष्ट्रातून ९६ महिला या खास आरक्षित जागेतून आमदार होणार आहेत. तसेच देशात खासदारांच्या ५४३ जागा असून तिथेही वन थर्ड महिला खासदार होणार आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. ज्या देशाने पुरुषाबरोबर महिलांना वागणूक दिली आणि संधी दिली, मान-सन्मान दिला ते देश जगात पुढे आहेत, असेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मी सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. सर्वांच्या सोबतीने पक्ष दिवसेंदिवस मजबूत बनत चालला असून जनकल्याणाचे काम वेग धरत आहे, ही बाब समाधानकारक असल्याची भावना यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली.