१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:45 IST2025-06-18T18:43:29+5:302025-06-18T18:45:11+5:30
NCP Ajit Pawar Group News: गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे गटाचा बालेकिल्ला राखणाऱ्या एका माजी आमदाराने अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
NCP Ajit Pawar Group News: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून महायुतीतील घटक पक्षात विरोधी पक्षांचे नेते सामील होत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विधानसभेत पराभवाचा मोठा धक्का बसला. यानंतर माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते मोठ्या प्रमाणात भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील होत आहेत. यातच नाशिकसह अनेक ठिकाणी ठाकरे गटाला खिंडार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा कोकणात उद्धवसेनेला धक्का बसला आहे. माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे रायगड संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती बाबुराव चोरगे, कारीवणे गावच्या सरपंच गीता चोरगे, जगन्नाथ चाळके, गणेश निर्मळ, बबन जोशी, मालती पवार, जागृती चाळके, रोशन मोरे यांच्यासह मराठा, कुणबी समाज संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही जाहीर प्रवेश केला.
हा माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे
१६ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तुकाराम सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात, हा माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर प्रवेशाबद्दल मत व्यक्त केले. १९९५ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला श्रीवर्धन राहिला होता. त्यावेळी राजकीय संघर्ष होता पण कोणताही मनभेद नव्हता. मी जेव्हा या मतदारसंघात निवडून आलो त्यानंतर परिवर्तन घडून आले. तुमची पक्षाशी निष्ठा राहिली म्हणून मला तिथे कमी मतदान मिळाले, अशी कबुलीही सुनील तटकरे यांनी दिली. तसेच तुमच्या धाटणीला बाजूला सारून तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधील झाला आहात, हा श्रीवर्धनच्या राजकीय इतिहासात दिवस उजाडला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसतच आहे. पक्षाला मोठे खिंडार पडताना दिसत आहे. नाशिकमध्ये एकीकडे सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात सामील झाले. तसेच पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव, मध्य प्रदेश, राजस्थान येथीलही पदाधिकारी, नेतेही शिवसेना शिंदे गटात आले. यातच कोकणातील माजी आमदारांनी अजित पवार गटात केलेला प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.