शेतकरी–महिला–युवकांसाठी मोठ्या घोषणा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला योजनांचा लेखाजोखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:23 IST2026-02-04T17:20:21+5:302026-02-04T17:23:04+5:30
Deputy CM Eknath Shine: आम्ही जे बोलतो ते करतो. आश्वासन देत नाही, काम करून दाखवतो, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

शेतकरी–महिला–युवकांसाठी मोठ्या घोषणा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला योजनांचा लेखाजोखा
Deputy CM Eknath Shine: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल मैदानावर भव्य जाहीर सभा पार पडली. हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार व नागरिकांसमोर बोलताना शिंदे यांनी महायुती सरकारच्या योजना, विकासकामे, शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण भागासाठी घेतलेल्या निर्णयांचा सविस्तर लेखाजोखा मांडत येत्या सात तारखेला महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. महात्मा बसवेश्वरांना वंदन केले तर, दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दुःखाचे सावट असतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी इथे आलो आहे. लाडक्या बहिणींना, भावांना भेटून येत्या सात तारखेला महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पाठवा, हीच विनंती करण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या गावाशी थेट जोडलेल्या असून लोकसभा, विधानसभा, नगर परिषद व महापालिका निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकांमध्येही महायुतीला भरभरून पाठिंबा मिळेल.
पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला
पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जिथे संकट, आपत्ती, गरज होती तिथे मी पोहोचलो. लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक आधार देण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी या योजनेसाठी वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचे नमूद केले. लखपती योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार, बचतगट, छोटे उद्योग व व्यवसाय उभे करण्यास प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही जे बोलतो ते करतो. आश्वासन देत नाही, काम करून दाखवतो, असेही ते म्हणाले. शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दावोस येथे सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे करार झाल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र इंडस्ट्री-फ्रेंडली राज्य असल्याचा दावा केला. पन्नास लाख तरुणांना रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे उद्योग, एमआयडीसी आणि पर्यटन प्रकल्प उभे करून स्थानिकांना स्थानिक रोजगार देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा सुरू करून ‘दुष्काळवाडा’ हा शब्द पुसून टाकण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. उमरगा पंचायत समितीची नवी इमारत, लोहरा व उमरगा तालुक्यांसाठी एमआयडीसी व मेडिसिटी, निम्न तेरणा प्रकल्पावर पर्यटन केंद्र, ग्रामीण रस्त्यांसाठी २६ कोटी रुपयांचा निधी, १९ ग्रामपंचायत इमारतींसाठी तरतूद, ४९४ पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे ८० कोटी रुपये, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी ६० कोटी रुपये तसेच दलित वस्ती सुधारणा, जनसुविधा, वैयक्तिक शौचालये, औषधी सुविधा आणि संत सेवालाल महाराज योजनेसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.