सावध व्हा ! नाहीतर निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय सरकार घेईल – धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 22:23 IST2018-01-23T22:23:45+5:302018-01-23T22:23:53+5:30
राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु भाजप ही वेडे झाले आहेत . सावध व्हा.सावध झालो नाही तर पुढच्या निवडणूकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला.

सावध व्हा ! नाहीतर निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय सरकार घेईल – धनंजय मुंडे
वसमत : राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु भाजप ही वेडे झाले आहेत . सावध व्हा.सावध झालो नाही तर पुढच्या निवडणूकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला. हल्लाबोल यात्रेत वसमत जि परभणी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
तुमच्या-माझ्या प्रश्नांसंबंधी या सरकारला काही देणंघेणं नाही.मांसबंदी करुन हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी मुंडे यांनी केला.
जे नेते भाजपात जात आहेत ते आजचे सुर्याजी पिसाळ आहेत – जयंत पाटील
भाजप पक्ष आता दिसेल त्याला पक्षात घेत आहे. विरोधी पक्षात असताना आजवर देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर आरोपांची राळ उठवली त्यांनाच आता पक्षात घ्यायला लागले आहेत. आपल्यावर कारवाई नको म्हणून जे नेते भाजपात जात आहेत, ते आजचे सुर्याजी पिसाळ आहेत अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी सेलू येथील जाहीक सभेमध्ये केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र संपावे यासाठी आम्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. कर्जमाफी नाही कर्जमुक्ती द्यायचे असल्याचे पालुपद मुख्यमंत्र्यांनी लावले होते. कर्जमाफी दिल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे लेखी देणार का ? असे संतापजनक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. शेवटी आम्ही संघर्षयात्रा काढून वातावरण निर्मिती केली. शेतकऱ्यांनी बंद पुकारला म्हणून घाबरून जाऊन सरकारने कर्जमाफी केली. मनापासून काम करायचे नसल्यास ते अर्धवट केले होते. म्हणूनच कर्जमाफीत अनेक अडचणी निर्माण करुन कुणालाही याचा लाभ मिळू नये अशा तरतूदी या योजनेत झाल्या असेही जयंत पाटील म्हणाले.
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिडियाविरोधी असतानाही अनेकवेळा पत्रकारपरिषद घेतात. मात्र आपले पंतप्रधानांनी साडे तीन वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारांना सामोरे जावून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता येणार नाहीत म्हणून ते फक्त आपल्या मर्जीतल्या पत्रकारांना मुलाखती देतात असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.