बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:00 IST2026-04-09T12:59:40+5:302026-04-09T13:00:34+5:30
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार काँग्रेस मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
CM Devendra Fadnavis News: अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची छाननीत ५३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ४७ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. यात बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीची धावाधाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची रीघ लागल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली. तर सुप्रिया सुळे यांनीही एक्सवर पोस्ट करत काँग्रेसने उमेदवार मागे घेण्याबाबत आवाहन केले. राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी तीनवेळा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केल्याचेही सांगितले जात आहे.
CM देवेंद्र फडणवीसांनी केला सपकाळांना फोन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. सुनेत्रा अजित पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवत आहेत, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. पण जी जागा रिक्त झाली ती अपघातामुळे. महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान प्रतिनिधी गमावला. मला विचारले तर मी काँग्रेसला सल्ला देईल की, या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, बारामती मतदारसंघातून उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बारामतीत अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे.