जालन्यात बांगलादेशी घुसखोरांना दणका! अवैध वास्तव्य करून चोऱ्या करणाऱ्या चौघांना कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:55 IST2026-02-11T12:54:29+5:302026-02-11T12:55:11+5:30
अवैधरीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशींना दोन वर्षांची शिक्षा

जालन्यात बांगलादेशी घुसखोरांना दणका! अवैध वास्तव्य करून चोऱ्या करणाऱ्या चौघांना कारावास
जालना : अवैधरीत्या भारतात प्रवेश, वास्तव्य करून चोऱ्या करणाऱ्या चार बांगलादेशी आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन दिवसांच्या कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली. सलमान शुमोन शेख, कुर्बान शाहीन आलम मंडाल, जाकेर फकीर बारीक फकीर शेख, शुमोन जुबेद अली शेख अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या सर्व आरोपींनी परतूर येथील गोकुळधाम सोसायटीमध्ये ७ मार्च २०२४ रोजी घरात चोरी करून कपाटातील रोख रक्कम ५,००० रुपये चोरून नेले होते. शिवाय, ९ मार्च २०२४ रोजी परतूर येथील सीतानंद पार्क येथील फिर्यादीच्या घरातून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी परतूर ठाण्यात गुन्हा क्रमांक १२२, २०२४ व गुन्हा क्रमांक १२४,२०२४ असे दोन गुन्हे दाखल केले होते. सदरील गुन्ह्याचा तपास पोउपनि व्ही. बी. केंद्रे यांच्याकडे देण्यात आला.
मा. न्यायालयापुढे बांगलादेशी आरोपींनी गुन्हा कबूल करण्याबाबतच्या अर्जावर सरकारतर्फे म्हणणे दाखल केले. नंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२ यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन अवैधरीत्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करून चोरी केल्याप्रकरणी प्रत्येक कलमामध्ये दोन वर्षे कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. जयश्री बी. सोळंके यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरवसे, सध्याचे पोलिस निरीक्षक भागवत आदींनी मोलाची मदत केली.