'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी , अध्यात्माला विज्ञानाची जोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:08 IST2025-06-30T16:06:18+5:302025-06-30T16:08:39+5:30
'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य

'आयटी'वाल्या पोरांची एआय दिंडी , अध्यात्माला विज्ञानाची जोड
फलटण : ‘एआय’चा वावर अनेक क्षेत्रात होताना दिसत आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या पंढरीच्या वारीतही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ने प्रवेश केला. माऊलींच्या पालखी सोहळ्यात एआय दिंडी पाहायला मिळाली. एआय दिंडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी, तसे विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायांतील लोकांना सामावून घेण्यात येणार आहे. तसेच एआयच्या माध्यमातून वारीवर नजर असणार आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त आयटी दिंडीतील तरुणाईत एक वेगळाच उत्साह संचारला आहे. आयटी दिंडी आणि एआय दिंडी मिळून एकत्रित सुमारे तीन हजार लोक सहभागी होणार असून, यंदाच्या दिंडीत महाराष्ट्रासह दिल्ली, बंगलोर, कोलकाता, चेन्नई यासह विविध देशातील आलेल्या नागरिकांचाही सहभाग असणार आहे. वेगळ्या राज्यात, शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेली तरुणाई सुट्ट्या काढून हमखास वारीमध्ये सहभागी होणार आहेत.
एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’
दरम्यान, वारीची परंपरा मोठी आहे. या परंपरेची ओळख सांगणारी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही ‘एआय’ची दिंडी यंदाच्या वारीचे आकर्षण ठरत आहे . ‘एआय’चा आध्यात्मिक इंटेलिजन्स नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न आहे. आणि एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ अशा ‘एआय’च्या घटकांचा मोठा खुबीने वापर करण्यात आला आहे.
भक्ती आणि आधात्म याची माहिती सांगणार
एआय हे वारीची परंपरा, भक्ती आणि आधात्म याची माहिती सांगणार आहे. तसेच वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, एआय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे ‘भजनसंध्या आणि वारीतील खेळ’ आयोजित करण्यात आले होते . तर ज्या दिवशी ज्या टप्प्यावर 3 पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी पुण्याहून बसची व्यवस्था केली आहे.
एआय ते अद्भुत अध्यात्मिक अनुभव ..
एआय दिंडी ही नफा नसलेली संस्था असून, ती विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अथवा व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींद्वारा सेवाभावी वृत्तीने चालवली जाते. अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे, हा या वारीचा उद्देश आहे.
'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य
आयटी दिंडीत एक अभिनव उपक्रमही सुरू करण्यात येत असून, आता आयटी दिंडीचा प्रवास 'पुणे ते पंढरपूर ऑल इन्क्ल्युसिव्ह दिंडी' म्हणजेच 'एआय दिंडी' या नावाने होणार आहे. या एआय दिंडीमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असेल आणि फक्त आयटीतील नोकरदारच नव्हे तर वकिलांपासून ते डॉक्टरपर्यंत... शिक्षकांपासून ते कलाकारांपर्यंत... अशा सर्वांना सामावून घेणाऱ्या एआय दिंडीत ते पायी चालणार आहेत. 'रक्षण्या सिंदूर, 'वार'करी शूर' हे घोषवाक्य एआय दिंडीचे असणार आहे. एआय दिंडीचे नियोजनही अंतिम टप्प्यात आले आहे.