मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू; सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 16:15 IST2023-10-29T16:15:22+5:302023-10-29T16:15:34+5:30

राज्यभरातून मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरुन विविध प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Arguments between Marathas and OBCs begin; said that Sushma Andhare | मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू; सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा

मराठा अन् ओबीसी यांच्यात वाद लावण्याचे काम सुरू; सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा

मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज चांगलीच खालावली आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच उपचार घेण्यास नकार दिला आहे. मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, असेही जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते. 

राज्यभरातून मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरुन विविध प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा बांधवांचा विधीवत लढा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. ४० दिवसांत कुठलाच निर्णय झाला नाही, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी यांचा वाद लावण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केली आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडून आपली पाठ थोपविण्याचे काम शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून होत आहे, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. 

जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे, जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे हे समजेल. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेवू. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नसल्याचं जरांगे पाटली यांनी सांगितले.

Web Title: Arguments between Marathas and OBCs begin; said that Sushma Andhare