मराठवाड्यात चिंताच; नाशिकची परिस्थिती सुधारली; विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:05 IST2024-07-25T07:01:40+5:302024-07-25T07:05:01+5:30
कही खुशी : ४८ तासांत धरणांच्या साठ्यात आठ टक्के वाढ

मराठवाड्यात चिंताच; नाशिकची परिस्थिती सुधारली; विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दोन दिवसांत विदर्भ, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाने राज्यातील एकूण १३८ मोठ्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून काही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्याचे चित्र आशादायी नसून धरणसाठ्यात कसलीही वाढ झालेली नाही.
गतवर्षी आजच्या तारखेला राज्यातील एकूण धरणांत ५४.५६ टक्के साठा होता, तर यंदा तो ४५.०८ टक्के झाला आहे.
मराठवाड्याला पाण्याची गरज
■ कोकण, पुणे आणि नागपूर विभागांतील धरणे पन्नास टक्क्यांच्यावर गेली असताना छत्रपती संभाजीनगर विभागात १२.६६ तर नाशिक विभागात ३४.६८ टक्के साठा आहे.
■ दोन दिवसांत पडलेल्या पावसाने नाशिकची स्थिती सुधारली आहे. नाशिक विभागात चांगला पाऊस झाल्यास गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाऊ शकते. ■ अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा साठा साठ टक्क्यांच्या वर गेल्याने विसर्ग केल्यास मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पातळी वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
• नाशिक विभागातील भावली (९६ टक्के), दारणा (७४ टक्के), गंगापूर ४२ टक्के, कडवा (६४ टक्के) आणि वैतरणा प्रकल्पात ४८.५२ टक्के साठा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ६३ टक्के भरले आहे.
सर्वात जास्त कोकण विभागात
सर्वात जास्त कोकण विभागात ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागात ५६% पाणीसाठा असून तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे विभागातील ३५ धरणांत ५२% पाणीसाठा झाला असून १८ धरणांमधील पातळी ६० टक्क्यांच्यावर गेल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे.
खडकवासला, राधानगरी, कुंडली ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही उजनी आणि जोगे धरण अद्याप मायनसमध्ये आहे. कोकणातील ११ धरणांपैकी तीन धरणे शंभर टक्के भरली असून बहुतांशी धरणांत ६० टक्केच्यावर साठा आहे.