" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:57 IST2025-06-27T11:56:20+5:302025-06-27T11:57:01+5:30
BJP Criticize Raj Thackeray & Uddahv Thackeray: मराठी भाषेसाठी परस्परांमधील मतभेद विसरून ठाकरे बंधू आंदोलनात एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पालिका निवडणुकीपूर्वी ही नव्या समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात्र हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आंदोलन करण्याच्या केलेल्या घोषणेची भाजपाने खिल्ली उडवली आहे.

" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिवकण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या आग्रही भूमिकेविरोधात राज ठाकरे यांच्या मनसेने तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच हिंदीच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येत्या ५ जुलै रोजी मुंबईत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. मराठी भाषेसाठी परस्परांमधील मतभेद विसरून ठाकरे बंधू आंदोलनात एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पालिका निवडणुकीपूर्वी ही नव्या समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात्र हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आंदोलन करण्याच्या केलेल्या घोषणेची भाजपाने खिल्ली उडवली आहे. मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. यांना मराठी भाषेचे काहीच देणघेण नाही हे प्रखर वास्तव आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या नियोजनाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या घोषणेवर टीका करताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आंदोलन हा मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न आहे. यांना मराठी भाषेचे काहीच देणघेण नाही. हे प्रखर वास्तव आहे. जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा काढणे हे हास्यास्पद आहे. ही जनतेच्या लक्षात येणार नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुळात गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा हा प्रयत्न आहे यांना मराठी भाषेचे काहीच देणघेण नाही हे प्रखर वास्तव आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 27, 2025
जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा… किती हास्यास्पद… जनतेच्या लक्षात येणार नाही?
महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाहीच तरी साप साप म्हणत भुई ढोपटण्याच काम… https://t.co/qyGqp60lqc
केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सक्ती आहे. हिंदीची सक्ती नाहीच. तरीही साप साप म्हणत भुई धोपटण्याचं काम सुरू आहे. हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल त्यांनी का स्वीकारला? त्याच उत्तर मोर्चा काढण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी द्यायला हवं. याच माशेलकर समितीने त्रिभाषा सूत्राचा आणि हिंदीचा आग्रह धरला होता, असा दावाही केशव उपाध्ये यांनी केला आहे.