LMOTY 2022: अमन मेहतानी ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 21:35 IST2022-10-11T21:32:53+5:302022-10-11T21:35:07+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: यंदा 'उद्योग' श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कारानं एडीएम ग्रुपचे अमन मेहतानी यांना गौरवण्यात आलं.

LMOTY 2022: अमन मेहतानी ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी
'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यंदा 'उद्योग' श्रेणीत 'लोकमतमहाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कारानं एडीएम ग्रुपचे अमन मेहतानी यांना गौरवण्यात आलं.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
इच्छाशक्ती असेल तर सगळं काही करता येतं, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एडीएम ग्रुपचे अमन मेहतानी. २००७ सालापासून अमन मेहतानी यांनी एडीएम ग्रुपची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नावीन्यपूर्ण कल्पनांनी आज ग्रुप नुसता बहरला नाही तर यशाच्या शिखरावर आहे. सिंगल इंडस्ट्री ऑर्गनायझेशन असल्याने धोरणात्मक नेतृत्व आणि व्यवस्थापनच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. आज एडीएम ग्रुपकडे काय नाही ते विचारा; ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग, रिॲलिटी, इंडस्ट्रीयल लिजिंग आणि ऑटोटेक असे सगळे काही ग्रुपकडे आहे. केवळ राज्यात, देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील जागतिक बेंचमार्क तयार करण्यासाठी ग्रुप आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
भविष्यात लांबचा पल्ला गाठण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले जात आहे. म्हणूनच की काय पुणेस्थित या ग्रुपला जागतिक स्तरावर पाऊल ठेवण्यास मदत झाली आहे. केवळ बिझनेस नाही तर ग्रुपला माणुसकीदेखील आहे. त्यामुळे आपले कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि समुदायासाठी काही तरी करण्याची उर्मी ग्रुपमध्ये आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून ग्रुपने काम केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी अधोरेखित केलेल्या शाश्वत विकासाशी नाळ जोडण्याचा ग्रुपने सातत्याने प्रयत्न केला आहे. समाजाचे ऋण फेडताना त्यांनी रोजगार निर्मिती, तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणे सामाजिक मूल्यांनादेखील ग्रुपने अग्रभागी स्थान दिले आहे.