"मुख्यमंत्री होशील तेव्हाच तुला भेटायला येईन अन् ती भेट झालीच नाही"; माजी केंद्रीय मंत्र्याचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:40 IST2026-01-28T12:39:46+5:302026-01-28T12:40:34+5:30
Plane Crash in Baramati: अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर, अजित पवारांच्या निधनावर अनेकांनी व्यक्त केला शोक

"मुख्यमंत्री होशील तेव्हाच तुला भेटायला येईन अन् ती भेट झालीच नाही"; माजी केंद्रीय मंत्र्याचे डोळे पाणावले
नांदेड - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी कळताच माझ्या मनाला ते पटले नाही. मात्र जी घटना घडली आहे, ते कटू सत्य स्वीकारावेच लागते. अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्रात होणे शक्य नाही. अधिकाऱ्यांवर वचक ठेवणारा, कार्यकर्त्यांसाठी झटणारा आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी त्यांची ओळख होती. मी त्यांना लहानाचा मोठा होताना पाहिले आहे असं सांगत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचे डोळे पाणावले.
सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, शरद पवार अजित पवारांना आपला मुलगा म्हणायचे आणि शरद पवारांचा राजकीय वारसा त्यांनी बारामतीत राहून पुढे नेला. आजच्या राजकारणात अजित पवारांचा मोठा प्रभाव होता. मी त्यांना असे सांगितले होते की, “तू चार वेळा उपमुख्यमंत्री झालास, जेव्हा मुख्यमंत्री होशील, तेव्हाच मी तुला भेटायला येईन पण दुर्दैवाने ती भेट होऊ शकली नाही हे सांगताना त्या भावूक झाल्या.
राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर
अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आज शासकीय सुट्टी जाहीर केली. त्याशिवाय पुढील ३ दिवस राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, त्या काळात त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली.
माझा मोठा भाऊ गेला...
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे.