एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 21:55 IST2025-06-12T21:53:55+5:302025-06-12T21:55:01+5:30
Air India Flight AI171 Crash : विमानाचे मुख्य पायलच क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता.

एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण...
एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन बंद झाले आणि पायलटनी मेढे, मेढे असा संदेश पाठविला परंतू एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून आलेल्या प्रतिसादाला पायलटकडून काहीच उत्तर आले नाही. या विमानाचे मुख्य पायलच क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता. यामुळे विमान विमानतळावर न कोसळता रहिवासी भागात कोसळले. हे दोन्ही को-पायलट मुंबई आणि बदलापूरचे रहिवासी आहेत.
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. दीपक ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते. आज आईसोबत तो बोलला होता. अहमदाबादला आहे, मी लंडनला निघणार आहे, असे त्याने सांगितले होते. त्याचा फोन आधी नॉट रिचेबल लागत होता, आता रिंग होत आहे. तिथे काय परिस्थिती आहे माहिती नाही, असे दीपकच्या मोठ्या बहिणीने सांगितले.
तर दुसरे को पायलट सुमित सबरवाल हे पवईचे रहिवासी आहेत. सुमित यांच्या घरी त्यांचे ८८ वर्षांचे वडील एकटेच आहेत. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन, असेही त्याने त्यांना सांगितले होते. सुमितच्या वडिलांना आता मुलगी आणि दोन नातवांचा आधार राहिला आहे. सुमित यांची बहीण दिल्लीला राहते, अपघाताची माहिती मिळताच ती तातडीने मुंबईला आली आहे.