राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 23:19 IST2025-06-12T23:18:26+5:302025-06-12T23:19:04+5:30

Raj Thackeray on Air India Plane Crash: अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Ahemadabad Air India Flight AI171 Crash : Raj Thackeray objects to 'Dreamliner'; Why is it being used despite so many complaints? Question to DGCA | राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

एअर इंडियाचे आज जे विमान कोसळले ते वादग्रस्त ठरलेल्या बोईंग या विमान कंपनीचे ड्रीमलायनर आहे. या विमानाबाबत जगभरातून खूप तक्रारी आहेत. या विमानांचे अपघातांवर अपघात होत आहेत. या कंपनीच्या इंजिनअरनेच बोईंगची पोलखोल केली होती. या विमानाच्या बांधणीत कंपनीने शॉर्टकट मारल्याचा आरोप त्याने केला होता. जपानमध्ये झालेल्या पहिल्या अपघातानंतर जगभरातल्या कंपन्यांनी काही काळ ही विमाने वापरणे बंद केले होते. अगदी भारतातही बंदी आणली होती. तरीही ती वापरली जात असल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. 

अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं. जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? असा सवाल राज यांनी विचारला आहे. 

तसेच आजचे अपघातग्रस्त विमान हे २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणले गेले. ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली. या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला ? ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी राज यांनी केली आहे. 
 
मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. ज्यांना हा सगळा विषय खोलात समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी जरूर हे वाचा, जमल्यास डॉक्युमेंट्री पण बघा, असे आवाहन राज यांनी केले आहे.

Web Title: Ahemadabad Air India Flight AI171 Crash : Raj Thackeray objects to 'Dreamliner'; Why is it being used despite so many complaints? Question to DGCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.