जालन्याच्या आखाड्यात; पुन्हा खोतकर-गोरंट्यालांचा सामना रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 10:37 AM2019-07-28T10:37:41+5:302019-07-28T11:09:28+5:30

दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट झाला असल्याने, पुन्हा विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल यांच्यातील सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

Again the Khotkar and Gorantyal Fighting clear | जालन्याच्या आखाड्यात; पुन्हा खोतकर-गोरंट्यालांचा सामना रंगणार

जालन्याच्या आखाड्यात; पुन्हा खोतकर-गोरंट्यालांचा सामना रंगणार

Next

मुंबई - जालना, औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीत युतीकडून ऐनवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव निश्चित झाल्याने, आगामी विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी केवळ २९६ मतांच्या फरकाने खोतकर निवडून आले होते. त्यामुळे यावेळी ही लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत यावेळी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र ऐनवेळी जालना, औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीत दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट झाला असल्याने, पुन्हा विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते कैलास गोरंट्याल यांच्यातील सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट?

जालना विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेत अत्यंत चुरशीची ठरते. २००९ मध्ये कैलास गोरंट्याल या मतदार संघातून आमदार होते. त्यावेळी खोतकर यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये खोतकर पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी जेमतेम २९६ मतांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. मात्र यावेळी युती आणि आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे यावेळी खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

राजकरण तापले

जालना पालिकेच्या विविध विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार अर्जुन खोतकर यांचे भाचे नीलेश हरिष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २६ जून रोजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री कक्ष कार्यालयाने विभागीय आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्यावर वैयक्तिक स्वरुपाचे गैरव्यवहाराचे आरोप राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या भाच्याला समोर करुन करत असल्याचा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला होता.

तर जालना पालिका म्हणजे गोरंट्याल यांची खाजगी मालमत्ता असल्या सारखा व्यवहार करत आहेत. तेथील वेगवेगळ्या विभागांतील बिलांची माहिती काढल्यावर मोठे धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत. यावर आम्ही गप्प बसणे म्हणजे जालन्यातील जनेतेचा विश्वासघात केल्यासारखे होणार आहे. त्यामुळेच आम्ही चौकशीची मागणी केली आहे. त्या चौकशीतून जे वास्तव पुढे येईल, ते आम्हालाही मान्य राहील. त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप आपण करत आहोत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. असे प्रतिउत्तर खोतकर यांनी दिले होते. त्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकरण विधानसभा निवडणुकीच्या आधीच तापताना दिसत आहे.

Web Title: Again the Khotkar and Gorantyal Fighting clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.