अखेर ‘त्या’कर्तबगार पोलिसांच्या सन्मानाला अखेर ‘मुहुर्त’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 18:22 IST2017-12-31T18:22:28+5:302017-12-31T18:22:39+5:30
समाजात कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत असताना बजाविलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्व कार्याची दखल घेत केंद्रीय गृह विभागाने त्यांना जवळपास तीन वर्षापूर्वी पदकाची घोषणा केली होती.

अखेर ‘त्या’कर्तबगार पोलिसांच्या सन्मानाला अखेर ‘मुहुर्त’!
जमीर काझी
मुंबई : समाजात कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत असताना बजाविलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्व कार्याची दखल घेत केंद्रीय गृह विभागाने त्यांना जवळपास तीन वर्षापूर्वी पदकाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात सन्मानाची प्रतिक्षा करीत त्यातील काहीजण सेवानिवृत्त झाले. नव्या वर्षात मात्र त्यांची ही प्रतिक्षा संपणार असून १६ जानेवारीला पदक वितरणाचा सोहळा होणार आहे.
२०१५ साली प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झालेल्या शंभर पोलीस अधिकारी, अंमलदारांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पदकाचे वितरण करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे राजभवन किंवा पोलीस मुख्यालयात होणारा हा सोहळा यंदा मात्र तो नरिमन पाईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्टानमध्ये होणार आहे.सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात येत आहे.
पोलीस खात्यात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवा बजाविलेल्या पोलिसांना केंद्रीय गृहविभागाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला राष्टÑपती पदक व पोलीस पदक विजेत्यांची घोषणा केली जाते. राज्य सरकारकडूनपाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार त्याबाबत निर्णय घेतला जात असतो. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर संबंधितांच्या नावाने बनविलेले पदक केंद्राकडून संबंधित राज्यांना पाठविले जाते.त्यासाठी साधारण सहा ते ८ महिन्याच्या अवधी अपेक्षित असतो. मात्र २०१५ या वर्षात घोषित झालेल्या पदकाचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे त्याच्या प्रतिक्षेमध्ये असलेल्या संबंधित पोलिसांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. आता त्याची तारीख निश्चित करण्यात आली असून येत्या १६ जानेवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते चार वाजता करण्यात येणार आहे. त्यापूर्वी १४ जानेवरीला या कार्यक्रमाची रंगीत तालीम सोहळ्याच्या ठिकाणी होणार आहे. त्याबाबत संबंधित अधिकारी, अंमलदारांना गणवेषात उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पहिल्यादाच वितरण
राष्टÑपती पदक वितरण सोहळा बहुतांशवेळा राजभवनात किंवा पोलीस मुख्यालयात केला जातो. हा समारंभ संबंधित पोलीस व त्यांच्या कुटुंबियासाठी आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो. त्यामुळे त्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक पदक विजेत्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील दोघाजणांना या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याची परवानगी दिली जाते. मात्र त्यांच्या उपस्थितीमुळे गर्दी होत असल्याने या महत्वाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उदभवतो, त्यामुळे यावर्षी या दोन्ही ठिकाणाऐवजी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
--------------
पदकांचे वितरण राज्यपाल, मुख्यमंत्री व गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थित होत असल्याने तो सुरळीतपणे पार पडण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाते. या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी रंगीत तालीम घेतली जाते. मात्र तरीही पदक स्विकारत असताना ऐनवेळी काही अधिकारी, अंमलदार भांबावून जातात, प्रोटोकॉल, सॅल्यूट, गणवेष आदीबाबतचे नियम न पाळल्याने गोंधळ उडतो. त्यामुळे यावर्षी संबंधित पदक विजेत्यांना कार्यक्रमाबाबत योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित घटकप्रमुखांवरही सोपविण्यात आली आहे.