अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, शरद पवार काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:19 IST2026-02-05T13:18:04+5:302026-02-05T13:19:25+5:30
Sharad Pawar: अजित पवार यांच्या निधानानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, यावर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, शरद पवार काय म्हणाले?
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती: सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी सांगितले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आम्ही सर्वजण मोठ्या संकटातून जात आहोत. या परिस्थितीत परस्परांना धीर देणे आणि पुढे कसे जायचे, यावर आमचे लक्ष आहे. कोणत्याही राजकीय निर्णयावर सध्या कुणाशी चर्चा सुरू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोविंदबाग येथे पत्रकार परिषदेत म्हणाले ते की, विलीनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस कुठेच नव्हते. मग माझा उल्लेख करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, हेच मला समजत नाही.अजित पवार यांच्या निधनानंतर २ दिवसांत शपथविधी झाल्याने पटेल, तटकरे हे नेते सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी अवघ्या सहा मिनिटांपूर्वी झालेल्या शेवटच्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली असून, पत्रकार परिषदेत ती ऐकविण्यात आली.
अजित पवार यांच्या शेवटचा संवाद उघड
अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजीत यांनी ८:१९ वा. उमेदवारीसंदर्भात टेक्स्ट मेसेज पाठवला होता. विमानात रेंज येताच अजित पवार यांनी ८:३७ वा. श्रीजीत यांना फोन केला. अपघाताच्या ६ मिनिटे आधी संवाद झाला. श्रीजीत पवार यांनी माळी समाजाच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे अनेक वर्षे माळी समाजाचा माणूस अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. आम्ही सगळ्या जाती-धर्माला सोबत घेऊनच जातो बाळा.”