राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:19 IST2025-05-05T06:18:46+5:302025-05-05T06:19:01+5:30
३०१५ गावे, वाड्यांची तहान टँकर्सवर; पातळी आणखी खालावणार

राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
- पवन लताड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील माेठे, मध्यम व लघु अशा २ हजार ९९७ सिंचन प्रकल्पात अवघा ३३.३७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे.
१९ जिल्ह्यांतील ७५८ गावे व २,२५७ गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ५७ शासकीय आणि ८७९ खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यापासूनच जलसंकट निर्माण झाले असून, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसल्या. त्यात तापमान चाळिशीपार गेले आहे. प्रकल्पांतील पाणी पातळीदेखील कमी हाेत चालली आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्य आग ओकत आहे. परिणामी प्रकल्पांतील पाणी पातळी अधिक कमी हाेईल, हे स्पष्ट आहे. पावसाळा सुरू हाेण्यास आणखी एक ते दीड महिना शिल्लक आहे.
काेणत्या प्रकल्पांमध्ये किती पाणीसाठा?
मोठे प्रकल्प १३८ ३१.९७ टक्के
मध्यम प्रकल्प २६० ४०.२९ टक्के
लघू प्रकल्प २,५९९ ३३.८१ टक्के
कुठे किती टँकर्स?
राज्यातील १९ जिल्ह्यात ९३६ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात ठाणे ४७, रायगड ३०, पालघर २८, नाशिक ९०, अहिल्यानगर ८, पुणे ६९, सातारा ६६, सांगली १८, साेलापूर १९, छत्रपती संभाजीनगर २४५, जालना १०१, परभणी १, धाराशिव २, अमरावती २०, वाशिम ४, बुलढाणा ३८, यवतमाळ १५, तर नागपूर जिल्ह्यात १५ टँकर्स लावण्यात आले आहे.
विभागनिहाय जलसाठा
विभाग प्रकल्प जलसाठा
नागपूर ३८३ ३५.७०%
अमरावती २६४ ४३.६१%
छ. संभाजीनगर ९२० ३२.७७%
नाशिक ५३७ ३७.५२%
पुणे ७२० २६.८६%
काेकण १७३ ४१.२२%