दोनदा संधी हुकली, पण माघार नाही; लातूरच्या डॉ. प्रीतमकुमारने अखेर यूपीएससी क्रॅक केलीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:15 IST2026-03-07T19:14:27+5:302026-03-07T19:15:03+5:30
यूपीएससी गुणवत्ता यादीत डॉ. प्रीतमकुमार भाले यांचे नाव; ७४२ गुणांसह पटकावले यश; जळकोट तालुक्यात जल्लोष!

दोनदा संधी हुकली, पण माघार नाही; लातूरच्या डॉ. प्रीतमकुमारने अखेर यूपीएससी क्रॅक केलीच!
जळकोट : मोठ्या कष्टाने दिवसरात्रं अभ्यास केला. परंतु, पहिली संधी ५ गुणांनी हुकली. दुसऱ्या प्रयत्नात नशिबाने साथ न दिल्याने अवघा एक गुण कमी पडला आणि अपयश आले. मात्र, जिद्द आणि आत्मविश्वास तसूभरही ढळू न देता डॉ. प्रीतमकुमार भाले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे.
जळकोट तालुक्यातील येवरी येथील बाबुराव भाले हे निलंगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत होते. त्यांना तीन मुले असून प्रियंका ही भूलतज्ज्ञ आहे. दुसरी मुलगी नेत्ररोग तज्ज्ञ आहे तर मुलगा प्रीतम हा डाॅक्टर आहे. डॉ. प्रीतमकुमार यांचे प्राथमिक शिक्षण लातुरातील वाले इंग्लिश स्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील केईएममधून एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. डॉक्टर होऊनही समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली आणि यूपीएससीचा अभ्यास सुरु केला.
पहिला प्रयत्नाची संधी केवळ ५ गुणांनी हुकली. त्यामुळे पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरु केला. मात्र, दुसरा प्रयत्नात नशिबाने साथ दिली नाही आणि केवळ एक गुणामुळे अपयश आले. अपयशामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरु केला. तिसऱ्या प्रयत्नात ७४२ गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले.
डोळ्यासमोर महापुरुषांचा आदर्श
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. वडील किशनराव भाले यांच्याकडून आम्हाला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. मुलांनीही यश मिळवून सार्थक केले आहे.
- बाबुराव भाले, वडील.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव...
डॉ. प्रीतमकुमार भाले यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचे कौतुक माजी मंत्री आ. संजय बनसोडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्यासह सरपंच सोमनाथ वाकळे, संतोष काकडे, राजकुमार भाले, विद्यासागर भाले, मनोहर वाकळे, मारुती तिर्थे, बळीराम तिर्थे आदींनी केले.