दिवसभर रुग्णसेवा, कर्तव्यावरून परतताना काळाचा घाला; ३० वर्षीय आरोग्य सेवकाचे अपघाती निधन
By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2026 22:23 IST2026-02-17T22:23:13+5:302026-02-17T22:23:25+5:30
रात्रीच्या काळाेखात भीषण अपघात : उदगीर-अहमदपूर महामार्गावरील घटना

दिवसभर रुग्णसेवा, कर्तव्यावरून परतताना काळाचा घाला; ३० वर्षीय आरोग्य सेवकाचे अपघाती निधन
राजकुमार जाेंधळे, हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : दिवसभर रुग्णांची सेवा करून, आपले कर्तव्य बजावून घराकडे परतणाऱ्या एका तरुण आरोग्य सेवकावर काळाने झडप घातली. उदगीर-अहमदपूर महामार्गावरील सुकणी गावाजवळ सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात संदीप हिरामण कांबळे (वय ३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हंडरगुळी गावावर शोककळा पसरली असून, यामुळे कुटुंबाचा आधार हिरवला गेला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अपघातातील मृत संदीप कांबळे हे गुडसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी आपली ड्युटी संपवून ते दुचाकीवरून (एम.एच. ५५ - ८७२५) आपल्या हंडरगुळी गावाकडे येत होते. दरम्यान, त्यांची दुचाकी सुकणी येथील पुलानजीक आली असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराने उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, संदीप कांबळे हे रस्त्यावर कोसळले आणि त्याच क्षणी वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक मदतीसाठी थांबण्याऐवजी अंधाराचा फायदा घेत वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
याबाबत मृताचे बंधू प्रदीप हिरामण कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून वाढवणा (बु.) पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक हालसे हे करीत आहेत. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
महामार्गावर वाहनांचा वेग, अपघाताचे सत्र थांबणार कधी?
‘रुग्णांची सेवा करणारा हात कायमचा विसावला,’ अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केला. दिवसेंदिवस रस्ते सुरक्षा आणि अज्ञात वाहनांचा वाढता वेग यामुळे आणखी किती निष्पापांना आपला जीव गमवावा लागणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून व्यक्त केला जात आहे.
अन् कांबळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर...
संदीप कांबळे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. घराची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. मंगळवारी दुपारी हंडरगुळी येथील आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.