शनिवारी सकाळपासूनच शहरातील रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. दरम्यान, पालिका, पोलीस, महसूल कर्मचारी रस्त्यावर उतरून वाहतूक पूर्णपणे थांबविली. तसेच ये- जा करणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराची चौकशी करून योग्य कारण असलेल्यांना सोडण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या १०० दुचाकीचास्वारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच चारचाकी वाहनांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, महात्मा बसवेश्वर चौक या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटणार असल्याने बहुतांश नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. तसेच गल्लीबोळातील दुकानेही बंद होती. पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सर्व दिवस नियमांचे पालन करावे...
लॉकडाऊनचा कालावधी ८ ते १३ मे आहे. या दिवसांत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच दवाखान्याच्या कामासाठी निघणाऱ्यांनी चेहऱ्यास मास्क लावावा. कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी सांगितले.
सकाळच्या सत्रात काही नागरिक शेताहून येण्यासाठी अथवा दूध आणण्यासाठी दिसून येत असल्याचे पाहून उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, एकनाथ कुंभार आदी अधिकारी प्रमुख चौकात थांबून कार्यवाही करण्यास सुरुवात केली.