पुण्यातून जामिनावर आला अन् लातूरात हॉस्टेलच्या दारातच विद्यार्थ्याची हत्या केली; चौघांना पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:55 IST2026-02-18T12:50:06+5:302026-02-18T12:55:02+5:30
वसतिगृहाच्या गेटवरच रक्ताचा सडा! डिप्लोमाच्या विद्यार्थ्याचा निर्घृण खून; प्रमुख आरोपी 'भोसरी'चा सराईत गुन्हेगार, वाचा धक्कादायक वास्तव

पुण्यातून जामिनावर आला अन् लातूरात हॉस्टेलच्या दारातच विद्यार्थ्याची हत्या केली; चौघांना पोलिस कोठडी
लातूर : औसा राेडवरील पुरणमल लाहोटी शासकीय मुलांच्या वसतिगृह प्रवेशद्वारावरच सोमवारी सायंकाळी किरकोळ वादातून एका २१ वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अटकेतील चारही आराेपींना मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. फिर्यादीने पाेलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. आकाश पेटकर याच्या दुचाकीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागितल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून, साेमवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास केदार महादेव क्षीरसागर (वय १९), श्रीधर तानाजी जाधव (वय २४, दाेघेही रा. शिवली, ता. औसा), प्रणव अप्पाराव उदगिरे (वय २०, रा. नळेगाव, ता. चाकूर), सुजल जेजेराव दिंडे (वय १९, रा. दिंडेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी संगनमत करून वसतिगृहाच्या प्रवेशद्वारासमाेरच फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना गाठले. आरोपींनी लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपी श्रीधर जाधव याने केदार क्षीरसागर याच्या सांगण्यावरून आपल्याकडील चाकूने फिर्यादी आदित्य सगरे, सुजल मरे आणि शंतनू परांडे यांच्यावर सपासप वार केले. दरम्यान, आरोपींनी विक्रम पांचाळ याच्या छातीवर, शरीरावर गंभीर वार केले, ज्यामध्ये विक्रम पांचाळ याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या इतर तिघा विद्यार्थ्यांवरही आराेपीने सपासप वार केले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी पहाटे चार आराेपींविराेधात बीएनएस कलम १०३ (१), १०९ (१), ५४, आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अटकेनंतर चाकू जप्त; न्यायालयात केले हजर
साेमवारी सायंकाळी करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर प्रमुख आराेपींसह चारही जण पसार झाले हाेते. दरम्यान, पाेलिसांनी त्यांच्या तासाभरात मुसक्या आवळल्या. चाकू जप्त केला असून, मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले.
पुण्यातील गुन्ह्यात जामिनावर; लातुरात विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला
अटकेत असलेला आराेपी श्रीधर तानाजी जाधव याच्याविराेधात पुणे येथील भाेसरी पाेलिस ठाण्यामध्ये २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या गुन्ह्यामध्ये ताे सध्याला जामिनावर बाहेर हाेता. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे.
- समीरसिंह साळवे, डीवायएसपी, लातूर