शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात
By राजकुमार जोंधळे | Updated: May 30, 2025 20:26 IST2025-05-30T20:26:21+5:302025-05-30T20:26:42+5:30
बाेअरला पाणी लागल्याने अभिषेकासाठी निघाले हाेते गीर कुटुंब

शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात
अजित चंदनशिवे / तुळजापूर (जि. धाराशिव) : बोअरवेलला लागलेल्या पाण्याच्या आनंदात शिखर शिंगणापूर येथे महादेवला पाण्याचा अभिषेक घालण्यासाठी निघालेल्या गीर कुटुंबीयाच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. यामध्ये पाचवर्षीय बालकासह आजीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक पुलावर घडली. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
पोमादेवी जवळगा (जि. औसा) येथील गीर कुटुंबीयाने मागील महिन्यात शेतात घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागले हाेते. बाेरअच्या पाण्याने शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय गावातून स्वतःच्या चार वाहनांतून (एमएच. २४-एयू. ५३८१) जात हाेते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक आला असता, पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळला.
दरम्यान, गाडीतील आरडाओरड, नातेवाइकांच्या आक्रोशमुळे रस्त्याने जात असलेल्या ट्रकचालकाने गाडी थांबवून बेशुद्ध अवस्थेतील पाच वर्षाचा अवधूत अमोल गीर या चिमुकल्यासह नरुत्तम प्रेम गीर (वय ६३) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी अवधूत गीर याला मृत घोषित केले, तर नरुत्तम गीर यांच्यावर उपचार सुरू केले, तर गंभीर जखमी अमोल नरुत्तम गीर (वय ३०), दुर्गा अमोल गीर (वय २४), वैष्णव हनुमंत पुरी (वय २५), गीतांजली अजिंक्य गिरी, जयश्री नरुत्तम गीर (वय ५३) यांना १०८ रुग्णवाहिकेतून तत्काळ घटनास्थळावरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच आजी जयश्री निरुत्तम गीर यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेमुळे गीर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.
जयश्री गीर या आहेत जिल्हा परिषद शिक्षिका...
देव दर्शनासाठी निघालेल्या जयश्री गीर या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. त्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका पदावर कार्यरत होत्या.
जखमींवर सुरू आहेत धाराशिव येथे उपचार...
अपघातात दुर्गा गीर यांच्या पोटचा गोळा मृत झाला आहे, तर गीतांजली गीर यांची जन्म दिलेल्या आई जयश्री यांचा ही मृत्यू झाला. जखमी झालेल्या दुर्गा गीर, वैष्णव पुरी आणि गीतांजली गिरी यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अमोल गीर आणि निरुत्तम गीर हे डिस्चार्ज घेऊन अंत्यविधीसाठी गावाकडे गेले आहेत.