लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल!
By राजकुमार जोंधळे | Updated: June 4, 2025 10:58 IST2025-06-04T10:58:41+5:302025-06-04T10:58:41+5:30
भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याचा बनाव; बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न

लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल!
लातूर : बेरोजगारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र सोशल मीडियात विशेषता कोल्हापुरात व्हायरल झाले आहे. या पत्राद्वारे तरुणांना रोजगार देण्यासाठी भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याचा बनाव करण्यात आला. दरम्यान, हे पत्र बनावट असून, असे कोणतेही आदेश लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नसल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एसआयएस इंडिया लि. या खासगी कंपनीमार्फत क्षेत्रीय स्तरावर भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र व्हायरल झाले. विशेष म्हणजे ते पत्र जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले.
या पत्रात सुशिक्षित बेरोजगारांना सुरक्षा क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, यासाठी खासगी कंपनीद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याचे म्हटले होते.
नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन शुल्क घेतले जाणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने व क्रमांक, दंड/०५/कावि/४०८८१७३/२०२५ दि. २८.०५.२०२५ अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आल्याचे भासविण्यात आले होते.
फसवणुकीपासून सावध राहा...
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याबाबत कोणतेही पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही. अशा बनावट पत्राद्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीपासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.