लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयाचा विवाह मुहूर्त हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:07+5:302021-05-14T04:19:07+5:30
अहमदपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अक्षय तृतीयाचा विवाहाचा मुहूर्त हुकणार आहे. उपवर वधू-वरांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर ...
अहमदपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचाही अक्षय तृतीयाचा विवाहाचा मुहूर्त हुकणार आहे. उपवर वधू-वरांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर कायदेशीर मर्यादेमुळे कार्यक्रमांना पायबंद बसला आहे. शुभमंगलसाठी आता सावधानता बाळगण्याची गरज आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेचा असल्याने हा दिवस शुभ मानला जातो. या मुहूर्तावर विवाह पार पडतात. शहर व तालुक्यातील अनेक जण हा मुहूर्त निवडतात. वर्षापासून वधू-वर व त्यांचे आई-वडील या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत असतात. मात्र मागील वर्षी व यंदाही लॉकडाऊनमुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकणार आहे. तसेच कार्यक्रमांनाही ब्रेक लागला आहे. या मुहूर्तावर वास्तुशांती, धार्मिक कार्यक्रम, नामकरण सोहळा आयोजित केला जातो. परंतु, कायदेशीर बंधनांमुळे अडचणी आल्या आहेत.
काही वधू-वरांनी उपलब्ध परिस्थितीत लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. मंगल कार्यालयास परवानगी नसल्यामुळे आपल्या घरासमोर विनामंडप केवळ मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे इतर धार्मिक विधी नाहीत. आता आणखीन १५ दिवस लॉकडाऊन वाढल्यामुळे विवाह मुहूर्त ज्येष्ठ अथवा आषाढ महिन्यात आहेत.
शुभ मंगलसाठी परवानगीची गरज...
विवाहासाठी तहसीलदार, पोलीस ठाणे व नगरपालिकेकडे अर्ज करणे बंधनकारक असून त्याची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. त्यामुळे बहुतांश वधू-वर पित्याने विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.
कोविड टास्क फोर्सचे लक्ष...
विवाहासाठी केवळ २५ वऱ्हाडींची मर्यादा आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात तलाठी, कोतवाल व पोलीस पाटलांवर जबाबदारी दिली आहे. त्यांनी माहिती न दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यात होणाऱ्या विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे प्राप्त होणार आहे. सर्वांनी नियमाचे काटेकोर पालन करून विवाह करावा, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
सुवर्ण खरेदीस मर्यादा...
प्रत्येक अक्षय तृतीयेस किमान एक गुंजपासून सुवर्ण खरेदी केली जाते. मात्र लॉकडाऊनमुळे सराफा व्यापार बंद असल्यामुळे सोने खरेदीला मंदी आली आहे. त्यामुळे शहरातील सराफा व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे व्यापारी माधव वलसे, अश्विन आंधळे यांनी सांगितले.