शेतीचा बांध फुटला अन् लातुरातील माळेगाव शाळेत पाणीच पाणी; शैक्षणिक साहित्यही पाण्यात
By राजकुमार जोंधळे | Updated: June 10, 2025 16:58 IST2025-06-10T16:58:17+5:302025-06-10T16:58:48+5:30
शालेय पोषण आहाराचे साहित्यही भिजले

शेतीचा बांध फुटला अन् लातुरातील माळेगाव शाळेत पाणीच पाणी; शैक्षणिक साहित्यही पाण्यात
गोविंद इंगळे / निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील माळेगाव (जे) परिसरात सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवारात पाणीचपाणी झाले. शेतातील बांध फुटला आणि नियमितपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानकपणे बदलून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी शिरले. शाळेच्या वर्गखोल्यांमध्येही पाणी शिरल्याने शैक्षणिक साहित्य पाण्यावर तरंगत होते. शिवाय, शालेय पोषण आहार, नवीन पुस्तकेही भिजली आहेत. सकाळी ११ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत केंद्र प्रमुखांनी पंचनामा केला.
माळेगाव प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीचे १०५ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत. उन्हाळी सुट्या असल्यामुळे शाळा बंद आहे. रविवारी मध्यरात्री व सोमवारी पहाटेच्या दरम्यान या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने आजूबाजूच्या शेतातील बांध फुटले आणि पाणी शाळेत शिरले. सर्वच वर्गखोल्यांसह मैदानात जवळपास तीन ते चार फूट पाणी थांबल्याचे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली. संरक्षक भिंतीला छिद्र पाडले असता काही वेळातच मैदानातील पाणी बाहेर निघाले. यात वर्गखोल्यांत असलेले शालेय साहित्य, कागदपत्रे, शालेय पोषण आहाराचे तांदूळ भिजले.
नवीन पुस्तकांची पोतेही भिजली...
शाळा सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देण्यासाठी आणून ठेवण्यात आली होती. मात्र पावसाचे पाणी वर्गात शिरल्याने नवीन पुस्तकेही पूर्णत: भिजली आहेत. सोमवारी सकाळी केंद्र प्रमुख डी.एम. शेख, मुख्याध्यापक विष्णुकांत कोलेवाड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिता जाधव, उपाध्यक्ष बाळू जाधव, सदस्य ज्योती पुठ्ठे, दिनकर कंठमणी, उपसरपंच राजेंद्र आरीकर, रमेश जाधव, नागनाथ जाधव, गणेश पाटील, राजेश जाधव, भगवान जाधव यांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. सदरील अहवाल पंचायत समितीकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शाळा वाचवा म्हणत...विद्यार्थ्यांची ओरड...
सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शाळेत पाणी शिरल्याचे लक्षात आल्यावर परिसरातील विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत पाणी शिरले, शाळा वाचवा, अशी ओरड करीत ग्रामस्थांना गोळा केले. काही वेळात पाण्याला मार्ग काढण्यात आला. त्यानंतर वर्गखोल्यांमध्ये गाळमिश्रित पाणी होते, तेही स्वच्छ करण्यात आले. तिसरीचा विद्यार्थी देवांश जाधव, चौथीचा संभाजी कंठमणी, पाचवीचा शिवाजी पोतदार, कार्तिक गायकवाड, इयत्ता आठवीचे दीपक जाधव, संदीप बनसोडे, रोहित जाधव या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी मदत केली.