कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. विशेष म्हणजे दुपारी कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जून महिन्यातच धुवाधार पाऊस कोसळल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने कमी झाली असून, अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. सायंकाळनंतर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गुरुवारी दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पूर्णपणे उघडीप राहिली. दुपारी तर चक्क ऊन पडले होते. धरणक्षेत्रातहीपाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३,१००, वारणातून १,७३५ तर दूधगंगातून १,६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असली तरी नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी दिवसभरात फुटाने कमी झाले आहे. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली असून, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनाबवड्यात ३३, भुदरगडमध्ये १२, आजरा २४, तर चंदगड १६.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी एकपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, पण उघडीप राहिली. आज, शनिवारी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला असून उद्या, रविवारपासून दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
पडझडीत नऊ लाखांचे नुकसानशुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यत २५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ९ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.