पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:58 IST2025-06-28T18:57:43+5:302025-06-28T18:58:33+5:30
कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको!

पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
कोल्हापूर : सध्या सुरू असलेला भाषेचा वाद निरर्थक असून, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज आहे, असा सल्ला देत एकीकडे शिक्षक नाहीत, पुस्तके नाहीत असे असताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.
चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केला आहे. कितीही भाषा ठेवा; पण शिकवायला मूलभूत सामग्री नाही. शिक्षणाची दुर्दशा झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाषेचा मुद्दा काढत आहेत. प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षण असेल त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असून, बाकीचे सर्व निरर्थक वाद आहेत. देशाला लिंक लँग्वेज म्हणून हिंदी भाषेचा वापर होतो. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. इंग्रजीमध्ये जेवढे नवीन संशोधन होत आहे ते इतर कोणत्याही भाषेत होत नाही. मात्र, इंग्रजीला बाजूला करा आणि स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करा यासाठी एक एक प्रयत्न सुरू असल्यानेच हा गदारोळ उठला असल्याची टीका त्यांनी केली.
विद्यमान सरकार मराठीला विरोध करू शकणार नाही; पण, ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबविले जात आहे त्यावरून त्यांना हिंदी ही एकच भाषा ठेवायची आहे असे दिसते. हे मुळात चुकीचे धोरण आहे. तीन भाषेचे धोरण आपण पूर्वीपासून स्वीकारले आहे, त्यामुळे हिंदी सक्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको!
मनसे आणि शिवसेनेच्या वतीने काढल्या जाणाऱ्या मोर्चात सहभागी व्हायचे की नाही ते प्रदेशाध्यक्ष ठरवतील. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, ही राज ठाकरे यांची पॉलिटिकल ॲक्शन आहे. कसा मोर्चा काढायचा हा त्यांचा भाग आहे; पण, मराठीवर अन्याय होता कामा नये, ही आमची भावना असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.