कोल्हापूर जिल्हा बँकेकडील साखर कारखान्यांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:14 IST2025-04-19T13:12:32+5:302025-04-19T13:14:27+5:30
एफआरपी आणि साखर दरातील तफावतीचे विदारक चित्र

कोल्हापूर जिल्हा बँकेकडील साखर कारखान्यांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
कोल्हापूर : एकीकडे उसाची एफआरपी वाढत असताना, दुसऱ्या बाजूला साखरेच्या दरातील वाढ पाहता, संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडील सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या रथयात्रा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा साखर कारखाने तीन महिने चालले असून हे विदारक चित्र बदलण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा लागेल. कारखान्यांनी या नवतंत्रज्ञानासाठी पुढाकार घ्यावा, त्याला जिल्हा बँक मदत करेल. उसाचे एकरी उत्पादन वाढल्याशिवाय आगामी काळात साखर उद्योग चालणार नाही. यामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान आशेचा अंधूक किरण दिसत आहे.
महायुतीने सुरू केलेल्या योजनांबाबत विरोधक अफवा पसरवत असून, एकही योजना बंद होणार नाही. राज्याची आर्थिक घडी सक्षम करत असताना विकासकामांना पैसे कमी न पडता योजना सुरू ठेवल्या जातील. लाडक्या बहिणींनाही योग्य वेळी २१०० रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहवीज, इथेनॉल प्रकल्प भंगार होणार
सौर ऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांची उत्पादन पाहता, मोठ्या कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय? अशी भीती वाटत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
केडीसीसी, गोकुळकडून सर्वाधिक आयकर
केडीसीसी बँकेने ३३ कोटी तर ‘गोकुळ’ने २८ कोटी नफ्यावर आयकर भरला आहे. सर्वाधिक आयकर भरणाऱ्या राज्यातील दोन संस्था असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मानसिंगदादा आला म्हणजे दुग्ध शर्करा योग
राष्ट्रवादीच्या बैठकीला मानसिंगराव गायकवाड यांना पाहून ‘मानसिंगदादा आले म्हणजे आज दुग्ध शर्करा योग असल्याचा चिमटा मंत्री मुश्रीफ यांनी काढला. यावर, साहेब, काही झाले तरी मी तुमचाच असल्याने गायकवाड यांनी सांगितले.
आता संजय घाटगेंना अडचण नाही
भाजपसह सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. माजी आमदार संजय घाटगे हे महायुतीत आल्याने आता त्यांना अडचण नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.