कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मानवाने हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे (आयआयएससी) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलिटी स्टडीजतर्फे ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ या विषयावरील व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यातील पहिले पुष्प ‘तापमानवाढ व जलस्रोतांवर होणारा परिणाम’ या विषयावर डॉ. कुलकर्णी यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. ढगफुटी, हिमस्खलन, भूस्खलन, फ्लॅश फ्लड अशी अनेक आव्हाने तेथील लोकसमुदायासमोर आहेत. हिमनदी तलावांची निर्मिती व त्याचा बेड रॉकवर पडलेला दबाव यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका अधिक वाढतो. हा धोका टाळणे शक्य आहे, पण त्यासाठी मॉडेलिंग टेक्निक वापरून फ्लो पाथ, व्हेलोसिटी, धोक्याची तीव्रता, हिमनदी तलावांचे स्थान व भविष्यातील त्याचा विस्तार या गोष्टींकडे नवीन अभ्यासकांनी लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. हवामान बदलांच्या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन आणि उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले.
लडाखमध्ये बर्फाच्या स्तूपव्दारे पाणी संवर्धन
‘पोटॅन्शियल ग्लॅशियर रिट्रीट : स्पिती व्हॅली’ या अभ्यासानुसार, सिंधु खोऱ्यातील स्पिती व्हॅली भागात भविष्यात २०५०पर्यंत जवळपास ६० टक्के, तर २०७०पर्यंत ६६ टक्के बर्फ वितळण्याची शक्यता व्यक्त केली. इतर ऋतूंमधील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी लडाखमध्ये बर्फाचे स्तूप निर्माण करून ७.५ कोटी लीटर पाण्याचे संवर्धन केले आहे. इतर भागांमध्ये हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी अधिक वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.