जिवाची बाजी लावणाऱ्या आम्ही वायरमन वीरांगना... राज्याच्या विकासात ५,५०० 'महिला वायरमन'ची मोलाची साथ
By भीमगोंड देसाई | Updated: March 8, 2026 05:52 IST2026-03-08T05:48:46+5:302026-03-08T05:52:59+5:30
एकेकाळी पुरुषांचे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या वायरमन कामात आता ५,५०० महिला कार्यरत आहेत.

जिवाची बाजी लावणाऱ्या आम्ही वायरमन वीरांगना... राज्याच्या विकासात ५,५०० 'महिला वायरमन'ची मोलाची साथ
भीमगोंडा देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऊन, वारा, पाऊस असो वा दिवस-रात्र, वीजपुरवठा खंडित झाला की कामावर हजर. जीव मुठीत धरून झाेपाळा लावून विद्युत खांबावर चढायला लागते. तोल गेला, वीज प्रवाह सुरू झाला, तर जीवच जायचा. म्हणून या क्षेत्रात एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी होती. मात्र, आता राज्यात ५,५०० महिला वायरमन काम करीत आहेत.
फिल्डवर जाऊन बिघाड दुरुस्त करतात म्हणून उजळते घर
शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन तक्रारी येताच, त्या कर्तव्यावर दाखल होतात. सुरक्षेची साधने परिधान करून त्या विजेच्या खांबावर चढतात आणि तुटलेल्या तारा, फ्यूज किंवा इतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करतात.
हे काम करताना प्रत्येक क्षणी जीव धोक्यात असतो. तरीही त्या कर्तव्यात कसूर करीत नाहीत. अनेकदा रात्री उशिरा किंवा आपत्कालीन स्थितीतही घटनास्थळी वीजपुरवठा सुरळीत करतात.
राज्यात महिला लाइनमनचे काम सक्षमपणे करीत आहेत. दामिनी पथक तयार करून वीज कनेक्शन बंद करणे, बिलांची वसुली, अशी कामेही करतात.
शर्मिला पाटील, उपाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ
बारावी सायन्सनंतर इलेक्ट्रिशियनचे शिक्षण घेऊन कोल्हापूर येथे वायरमन म्हणून रुजू झाले. विद्युत खांबावर चढून आणि रोहित्रावर थांबून सहजपणे जोखमीची काम करते.
ज्योती कांबळे, वसगडे, ता. करवीर