गोठ्याचा झाला बंगला, शेडऐवजी टोलेजंग इमारत; शर्तभंगाने पोखरल्या देवस्थानच्या जमीनी
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 29, 2025 17:52 IST2025-05-29T17:52:20+5:302025-05-29T17:52:51+5:30
देवाच्या नावावर कसून खायला दिलेल्या जमिनी देवाचे नाव काढून टाकून स्वत:चे नाव लावणे, परस्पर विक्री, उत्पन्न कमी दाखवून खंड चुकवेगिरी, अतिक्रमण, शर्तभंगाने पोखरून टाकल्या

गोठ्याचा झाला बंगला, शेडऐवजी टोलेजंग इमारत; शर्तभंगाने पोखरल्या देवस्थानच्या जमीनी
इंदुमती गणेश
कोल्हापूर : राज्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सर्वाधिक २७ हजार एकरांहून अधिक जमिनी आहेत. देवाच्या नावावर कसून खायला दिलेल्या जमिनी देवाचे नाव काढून टाकून स्वत:चे नाव लावणे, परस्पर विक्री, उत्पन्न कमी दाखवून खंड चुकवेगिरी, अतिक्रमण, शर्तभंगाने पोखरून टाकल्या आहे. हजारो एकर जमिनीतून कोट्यवधींचे उत्पन्न मिळणे शक्य असतानाही समितीचा कारभार श्री अंबाबाईच्या उत्पन्नावर चालवावा लागतो, विकासकामांसाठी शासन दरबारी हात पसरावे लागते, यांसारखे दुर्दैव नाही.
कसायला दिलेल्या देवस्थान जमिनींवर शेतकऱ्यांकडूनच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि शर्तभंग झाले आहे. गोठा दाखवला, प्रत्यक्षात बंगला आहे, पत्र्याच्या शेडच्या जागी टोलेजंग इमारत आहे. चंदगड, करवीरसारख्या तालुक्यांमध्ये देवाचे नाव काढून सातबारावर स्वत:चीच नावे लावली आहेत. जमिनीची एकाने दुसऱ्याला, त्याने तिसऱ्याला विक्री केली. काही जमिनींवर खासगी शिक्षण संस्था आहेत. सातबारावर पिकांची नोंदच करायची नाही, उत्पादन दाखवायचे नाही, यामुळे देवस्थानचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणांची, शर्तभंगाची मोजणी झालेली नाही.
अंबाबाई जमिनीत मागे, उत्पन्नात पुढे
अंबाबाई मंदिराला भाविकांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न साधारण ३० ते ३५ कोटींपर्यंत आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे करवीर निवासिनीच्या नावे जमिनी मात्र फक्त १०५ हेक्टर आहे. मंदिराच्या देणग्यांमधूनच कर्मचाऱ्यांचे पगार, लाइट, पाणी बिलापासून विकासकामांपर्यंत सगळा खर्च केला जातो. अंबाबाई पाठोपाठ जोतिबा देवाचे उत्पन्न असले, तरी ते नगण्य आहे. या मंदिरालाही अंबाबाईचीच रक्कम वापरावी लागते.
खंडातून नुकसानच
शेतकरी खंड भरावा लागू नये, म्हणून ऊस लावला तर माळवं, भात लावला तर नाचणी लावली म्हणत उत्पादन कमी दाखवतात. निम्मा खर्च वजा जाता उर्वरीत रकमेचा ६ वा भाग खंड म्हणून देण्याचा कायदा आहे, पण तो मोजायचा कसा, हा प्रश्न आल्याने उसाला एकरी दीड हजार, जिरायतला एकरी ३०० रुपये अशी ठोक रक्कम ठरवली गेली. याला २० वर्षे लोटली. उत्पादन, उत्पन्नातही वाढ झाल्याने खंडाची रक्कम वाढवली पाहिजे.
जमिनींबाबत सर्वात श्रीमंत मंदिरे
- श्री काळम्मादेवी उदगिर (ता. शाहुवाडी) : २५०५.१६ हेक्टर (६२६० एकर)
- श्रीकेदारलिंग, जोतिबा (वाडी-रत्नागिरी, ता. पन्हाळा) : ४६४.९ हेक्टर (११६० एकर)
- श्री देव वैजनाथ (देवरवाडी, चंदगड) : २६३.९४ हेक्टर (६५९ एकर)