कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; संजय पवारांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा, भूमिका जाहीर करताना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:41 IST2025-06-30T14:40:57+5:302025-06-30T14:41:30+5:30
शेवटच्या श्वासापर्यंत ‘मातोश्री’चा सेवक म्हणून काम करणार : राजीनामा मागे घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह

कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; संजय पवारांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा, भूमिका जाहीर करताना अश्रू अनावर
कोल्हापूर : उद्धवसेनेचे उपनेते, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणूकीपासून जिल्हाप्रमुख नेमणूकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो तरी गेली ३६ वर्षे ‘मातोश्री‘वर श्रध्दा ठेवून काम केले आणि येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते. संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती. पण, शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला. त्यातून युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला. तर, उपनेते संजय पवार यांनी सोमवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार सोमवारी, शासकीय विश्रामगृहावर उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, यामध्ये त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी, राजीनामा देऊ नका, तुम्ही देणार असाल तर सगळेच राजीनामा देतो असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. पण, ते राजीनाम्यावर ठाम राहिले.
पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, राजू यादव, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.
पवार यांना अश्रू अनावर
गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ हाेते. पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पक्षाने खूप दिले...
सामान्य शिवसैनिक ते उपनेते पद देत असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे उपाध्यक्षपद, राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान केला. पक्षाने आपणाला खूप दिले, पण ज्या पध्दतीने निर्णय घेताना पक्षाकडून वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.