Kolhapur Politics: युतीमुळे विधानसभा सर.. जिल्हा परिषदेची वाट मात्र खडतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:14 IST2025-05-19T17:13:32+5:302025-05-19T17:14:14+5:30
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कसरत : विधानसभेचा करिष्मा कायम ठेवण्याचे आव्हान

Kolhapur Politics: युतीमुळे विधानसभा सर.. जिल्हा परिषदेची वाट मात्र खडतर
शरद यादव
कोल्हापूर : जिल्हा परिषद-पंचायत समितीचे मैदान लवकरच सुरू होणार असल्याने इच्छुकांनी संपर्क यंत्रणा गतिमान केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून मताचे दान पारड्यात टाकल्याने सर्वच दहा जागा जिंकत महायुतीने क्लीन स्वीप दिला होता. आता मात्र झेडपीच्या आखाड्यात महायुती एकत्र लढण्याची शक्यता कमी असल्याने विद्यमान आमदारांना आपले जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.
हसन मुश्रीफ : कागल-गडहिंग्लज मतदारसंघातून समरजित घाटगे यांचे कडवे आव्हान परतावून लावत मुश्रीफ यांनी सहाव्यांदा ११ हजार मतांनी विजय मिळविला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती वेगळी लढल्यास भाजपवासी झालेल्या संजय घाटगे व शिंदेसेनेचे संजय मंडलिक यांच्याविराेधात मुश्रीफ यांना मैदानात उतरावे लागेल. समरजित घाटगे यांनी अजून पत्ते खुले केले नसले तरी त्यांच्या गटाचे आव्हान असेलच; यामुळे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणताना मुश्रीफांचा कस लागणार आहे.
प्रकाश आबिटकर : राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून ३८ हजारांचे मताधिक्य घेऊन थेट कॅबिनेटमंत्री झालेले आबिटकर यांना पुन्हा आपली ताकद दाखवावी लागणार आहे. विधानसभेनंतर आता के. पी. पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसह काँग्रेसबरोबर त्यांना दोन हात करावे लागतील. शिवाय कॅबिनेटमंत्री असल्याने पदाला साजेसे यश मिळविण्यासाठी व्यूहरचना आखावी लागणार आहे.
विनय कोरे: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून ३६ हजारांचे मताधिक्य घेत विनय कोरे यांनी सरुडकरांचे आव्हान परतावून लावले होते. नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली असली तरी मु्ख्यमंत्र्यांच्या गुडबुकमध्ये त्यांचे नाव असल्याने जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. परंतु महायुती वेगळी लढली तर जनसुराज्यला भाजपची शक्ती मिळणार नाही. त्यामुळे स्वबळावर त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने त्यांच्या ताकदीची परीक्षा होणार आहे. दहा जागा निवडून आणत किंगमेकर होण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
चंद्रदीप नरके : करवीरच्या मैदानात नरके यांनी पी. एन. पाटील यांच्या पश्चात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत केवळ १९७६ मतांनी विजय मिळविला होता. राहुल पाटील यांचा आजही गावोगावी मजबूत गट असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत काट्याची लढत होणार आहे. त्यातच भाजपची साथ नसेल तर नरके यांचा प्रवास आणखी खडतर होण्याची शक्यता आहे. पन्हाळा तालुक्यातील काही भाग तसेच गगनबावडा तालुका या मतदारसंघात असल्याने सतेज पाटील व विनय कोरे यांच्याशीही नरके यांना दोन हात करावे लागतील.
राजेंद्र पाटील, यड्रावकर : शिरोळच्या निर्णायक मैदानात ४० हजार मतांनी विजय मिळवून आपणच दादा असल्याचे यड्रावकर यांनी दाखवून दिले होते. पण आता जिल्हा परिषदेसाठी यड्रावकर विरुद्ध सर्वच गट एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, उद्धवसेना अशी मोट बांधली तर मिनी विधानसभेत यड्रावकर यांना मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. राजू शेट्टी, गणपतराव पाटील, उल्हास पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व राहणार असून, येथील सामना रंगतदार होणार आहे.
अमल महाडिक : प्रतिष्ठेच्या लढाईत अमल यांनी कोल्हापूर दक्षिणमधून १८ हजार ३३७ मतांनी धक्कादायक विजयाची नोंद केली होती. आता सतेज पाटील झेडपीच्या लढाईसाठी पुन्हा गोळाबेरीज करण्यास सज्ज झाले असल्याने दक्षिणेत पुन्हा एकदा पारंपरिक लढाई रंगणार असे संकेत मिळत आहेत. जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांत टोकाची इर्षा दिसून येणार आहे.
राहुल आवाडे : पहिल्याच निवडणुकीत राहुल आवाडे यांनी तब्बल ५६ हजारांंनी विजय मिळवत हवा केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीचे संदर्भ वेगळे असल्याने ही हवा कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. इचलकरंजी परिसरात आवाडे विरुद्ध सर्व असाच सामना होणार असल्याने जि. प.ची निवडणूक टोकदार होईल. भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी मैदानात असेल.
अशोकराव माने : हातकणंगलेतून अशोकराव माने यांनी चमत्कार करत तब्बल ४६ हजार मतांनी राजू आवळे यांना चितपट केले होते. आगामी निवडणुकीत भाजप वेगळी लढली तर माने यांना जनसुराज्यची ताकद दाखवावी लागणार आहे. मतदारसंघात आवळे, महाडिक, यड्रावकर, आवाडे यांची चांगली ताकद आहे. यातून जनसुराज्यचा दिवा लावण्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
शिवाजीराव पाटील : चंदगडमधून अपक्ष शिवाजीराव पाटील यांनी २४ हजार मतांनी विजय मिळवत महायुतीचे राजेश पाटील यांना धोबीपछाड दिला होता. आता जिल्हा परिषदेला त्यांच्याविरोधात राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धवसेनेचे आव्हान असेल. शिवाजीराव पाटील यांनी भाजपाचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने त्यांना सत्तेचे बळ मिळणार असले तरी विधानसभेचे वातावरण टिकवून ठेवताना कसरत होणार आहे.
- ६७ झेडपीच्या एकूण जागा
- १३४ पंचायत समिती गण