ashadhi wari 2025: माणिक-राजा ओढणार तुकाराम महाराजांचा रथ, आप्पाचीवाडीच्या बैलजोडीला मिळाला कायमस्वरुपी मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:54 IST2025-06-14T11:53:08+5:302025-06-14T11:54:34+5:30
बेंदूर सणाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून या बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले.

ashadhi wari 2025: माणिक-राजा ओढणार तुकाराम महाराजांचा रथ, आप्पाचीवाडीच्या बैलजोडीला मिळाला कायमस्वरुपी मान
दत्तात्रय पाटील
म्हाकवे : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा देहू येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा बहुमान आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील बाबुराव अर्जुन खोत यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला कायमस्वरूपी लाभला आहे. ही बैलजोडी देहू संस्थांनकडून खरेदी केली आहे. बेंदूर सणाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून या बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले.
अगदी पाहतच राहावा असा पांढरा शुभ्र, अंगाने धिप्पाड, एकसारखा जोडा असणारी ही बैलजोडी गावची शान होती. त्यामुळे बैलजोडीला निरोप देताना खोत कुटुंबासह गावकरी भावनाविवश झाले होते. परंतु, तुकाराम महाराज यांच्या ७५० व्या पुण्यतिथी वर्षात आपली बैलजोडी भगवंताच्या सेवेत लीन होण्यासाठी जात असल्याने त्यांना मनोमनी आनंदही वाटत होता.
यापूर्वी या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी ही तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. मात्र रथ ओढण्यासाठी आपल्याच बैलजोडीला मान मिळावा यासाठी चढाओढ लागत असत. त्यामुळे रथासाठी हक्काची बैलजोडी असावी या उद्देशाने देहू संस्थानने महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात बैलजोडीची चाचपणी करताना त्यांना खोत यांची बैलजोडी पसंत आली.
दरम्यान, २०२१ व २०२३ मध्ये खोत यांच्याकडील पुण्यातील बड्या मंडळींनी खरेदी करून ती या रथासाठी दिली होती. ५० एकर जमीन असणाऱ्या खोत कुटुंबातील पाच भावंडे एकत्रितपणे राहतात.
मिरवणुकीने निरोप
पहिल्यांदाच संस्थानने बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा बहुमान श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील बैलजोडीला लाभला. त्यामुळे बैलजोडीला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते.
आमच्या कुटुंबातील सदस्यच असणाऱ्या बैलजोडीला तुकाराम महाराज यांच्या सेवेचा मान मिळाला हे आमचे परम भाग्यच आहे. आमच्या कुटुंबीयांनी अगदी आनंदाने ही बैलजोडी देहू संस्थानकडे सोपविण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याने आर्थिक व्यवहारही पूर्ण केला. - बाबुराव खोत, शेतकरी आप्पाचीवाडी