कोल्हापूर : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देशातील जे महामार्ग खराब व खड्डे पडलेले आहेत त्याबाबत टोल आकारणी करता येणार नसल्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कानउघाडणी केली आहे. यामुळे तातडीने कोल्हापूर ते पुणे व कोल्हापूर ते बेळगाव या महामार्गाची टोल आकारणी थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे केली आहे.केरळ उच्च न्यायालयात खराब झालेल्या अथवा दुरुस्ती सुरू असणाऱ्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गास टोल आकारणी करता येणार नाही, असा निकाल दिला आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयात गेले; पण सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा नागरिकांना कोणतीही टोल न आकारणी करता रस्त्यावर प्रवास करू द्यावा.
त्यांनी आधीच त्यांच्यासाठी कर भरलेले आहेत. त्यांना अशा गटारयुक्त, खड्डेमय रस्त्यावर प्रवास करण्यास भाग पाडताना टोलवसुली करू नये. ही तुमच्या कार्यक्षमतेची निशाणी आहे, अशा शब्दांत सध्याचे सरन्यायाधीश व तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्रन, न्यायमूर्ती अंजारिया यांनी फटकारून याचिका फेटाळली होती. याबाबत संबंधितांकडून येत्या आठवड्याभरात कारवाई न झाल्यास अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी पत्रकातून दिली आहे.