विशाळगड, उदगिरी, आंबा, अणुस्कुरा घाटात गुन्हेगारी जोरात : पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:35 IST2019-09-26T23:33:33+5:302019-09-26T23:35:18+5:30
विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण

शाहूवाडी तालुक्यातील जंगल व घाटातील निसर्गरम्य ठिकाणे दुर्गमतेमुळे गुन्हेगारीचा विळखा बनत आहेत.
- आर. एस. लाड ।
आंबा : कोल्हापूरच्या सीमेवरील विशाळगड, उदगिरी, आंबा व अणुस्कुरा घाट हा निसर्गरम्य व ऐतिहासिक ठिकाणे निर्जन व दुर्गमतेमुळे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनत आहेत. शुक्रवारी विशाळगड मार्गावरील कोकण पॉर्इंटवर इंचलकरंजीच्या तरुणांनी वर्चस्वाच्या ईर्षेतून संतोष तडाखेला येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी आणूून रस्त्यापासून केवळ वीस फुटांवर गळा चिरून दरीत फेकले. दीड वर्षापूर्वी मानोली धरणावरील झाडीत रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर सडलेल्या मृतदेहाचा पंचनामा करावा लागला. चार वर्षांपूर्वी पावनखिंडीत भीक मागणाऱ्या एका धनगराच्या वृद्धेला मारून टाकले होते. निर्जनता, दुर्गमता व पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे गुन्हा करून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी ही दुर्गम ठिकाणे सोईची होत असल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. त्याची दहशत स्थानिकांची डोकेदुखी बनत आहेच, शिवाय येथील निसर्ग पर्यटनाला छेद देणारी ठरत आहे.
विशाळगडावर दारू , कोंबडी नि हुक्का यासाठी येणारी हौसी मंडळी वाढली आहे. त्यातून मारामारी, दादागिरी विशाळगडचे ऐतिहासिक पावित्र्य नष्ट करीत आहे. तीन वर्षांपूर्वी गडावरील दारूबंदीला पोलीस अधिकारी धुमाळ यांचा पाठिंबा मिळाला नि गडावर शांतता नांदू लागली. अवैध व्यवसायासह गुन्हेगारी प्रकारांवर अंकुश बसला होता; पण अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अवैध व्यावसायांनी गडावर पुन्हा डोके वर काढले. उदगिरी व धोपेश्वर ही देवस्थानेही जंगलातील आहेत. जुगाई येथील पावणाई मंदिर उदगिरीतील काळाम्बाई येथेही कोंबड्याचा बळी देणारी, लिंबू जपणारी देवदेवस्कीची अंधश्रद्धा जपली जाते. त्यातून गुन्हेगारी घटनांना बळ मिळते. गेल्या दोन वर्षांत ग्रामीण भागात चोरीचे प्रमाणही वाढले आहे.
घातपात की अपघात
गेळवडे जलाशयाचे बॅक वॉटरचे पात्र केंबुर्णेवाडी ते गजापूर असे चार किलोमीटर रस्त्यालगत विस्तारले आहे. विशाळगडावर येणारा भाविक या जलाशयावर अंघोळ, कपडे व वाहन धुणे, भोजनासाठी येथे विसावतो; पण जलाशयाचा अंदाज नसल्याने अंघोळीस जाणाऱ्यांना जलसमाधी मिळालेल्या घटना दरवर्षी येथे घडतात. बाराजणांना येथे जलसमाधी मिळाल्यानंतही येथे बंदी घालण्याचे प्रशासनाला सूचलेले नाही. प्रथमदर्शनी अपघात कधी कधी घातपात तर नसावा, असा प्रश्न येथे पडतो. आपत्कालीन व्यवस्थेची या भागात मोठी गरज आहे.