कोल्हापूर विमानतळावरुन सात वर्षांत १७ हजार विमानं उडाली, किती प्रवाशांनी केला प्रवास.. वाचा सविस्तर

By पोपट केशव पवार | Updated: June 7, 2025 14:00 IST2025-06-07T14:00:27+5:302025-06-07T14:00:43+5:30

राजकीय उड्डाणे सर्वाधिक

Seventeen thousand flights took off and landed from Kolhapur Airport 7 lakh passengers travelled | कोल्हापूर विमानतळावरुन सात वर्षांत १७ हजार विमानं उडाली, किती प्रवाशांनी केला प्रवास.. वाचा सविस्तर

कोल्हापूर विमानतळावरुन सात वर्षांत १७ हजार विमानं उडाली, किती प्रवाशांनी केला प्रवास.. वाचा सविस्तर

पोपट पवार

कोल्हापूर : गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी ज्या उजळाईवाडीच्या माळावर चिटपाखरूही फिरकत नव्हते, त्याच उजळाईवाडी येथे असलेल्या कोल्हापूरविमानतळावरून गेल्या सात वर्षात तब्बल ७ लाख ६४ हजार ६६९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२५ या काळात शेड्यूल आणि नॉन शेड्यूलसह तब्बल १७ हजार ६१८ विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग झाले आहे. काही वर्षांपूर्वी छोटे विमानतळ म्हणून गणल्या जात असलेल्या या विमानतळाची कनेक्टव्हिटी दिवसेंदिवस वाढत असल्याने देशातील प्रमुख विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळ गणले जात आहे.

२०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या कोल्हापूर विमानतळावर गेल्या सात वर्षांत पायाभूत सुविधांबरोबर देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढली आहे. कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळुरू या मार्गावर रोज विमानसेवा आहे. सध्या हैदराबाद व बंगळुरूसाठी आठवड्यातून तीन दिवस अधिकची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-नागपूर या मार्गावरही आठवड्यातून तीन दिवस सेवा सुरू केली आहे. या सर्वच मार्गांवरील सेवेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सांगलीकरांसह कऱ्हाडचीही सोय

पूर्वी विमानाने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना बेळगावला जावे लागत होते. मात्र, कोल्हापूर विमानतळ सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकरांची सोय झाली. शिवाय सांगली जिल्ह्यातील व कऱ्हाडच्या आसपासच्या भागातील लोकांनाही कोल्हापूर विमानतळ सोयीचे बनले आहे.

कनेक्टिव्हिटी'चा लाभ

कोल्हापूर-दिल्ली या विमानसेवेसाठीही सध्या चाचपणी सुरू आहे. सध्या कोल्हापुरातून दिल्लीला जाण्यासाठी हैदराबादमार्गे कनेक्टव्हिटी फ्लाइट आहे. शिवाय मुंबई, बंगळुरू येथूनही कनेक्टिव्हिटी फ्लाइट असल्याने कोल्हापूर विमानतळावरून जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करणे पसंत करतात.

राजकीय उड्डाणे सर्वाधिक

कोल्हापुरात विविध कार्यक्रम, सोहळे व अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधींची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांत २४१३ नॉन शेड्यूल विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग झाले आहे. यातून १२०२७ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

सात वर्षांत साडेसात लाख जणांचा प्रवास

कोल्हापूर विमानतळावरून २०१८ ते २०२४ या सात वर्षांत तब्बल ७ लाख ६४ हजार ६६९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. शेड्यूल आणि नॉन शेड्यूलसह तब्बल १७ हजार ६१८ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग झाले आहे.

दृष्टिक्षेपात प्रवासी अन् विमाने

तारीख  - विमाने  - प्रवासी

२०१८-२०१९ - ७५५  - १७८४३
२०१९-२०२०  -  ३००८  -  १३२०७४
२०२० -२०२१ -  २०१८  -  ७१३७१
२०२१- २०२२  - २३४८  - ९७८२७
२०२२-२०२३  -   २७३४  - १२८७७६
२०२३-२०२४  -  ३२२५  -  १५७३२०
२०२४-२०२५  -   ३५३०  -   १५९४५८

Web Title: Seventeen thousand flights took off and landed from Kolhapur Airport 7 lakh passengers travelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.