कोल्हापूर :शेती वाचवा, शेतकरी वाचवा असा नारा देत कृषीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात रद्द करा, रद्द करा, कृषी कायदे रद्द करा, इंधन दरवाढ मागे घ्या, अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेकापने आंदोलनाची हाक दिली होती. दुपारी एक वाजता बिंदू चौकातून सुरू झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनाचे नेतृत्व बाबूराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील यांनी केले.यात दिलीप जाधव, संभाजी जगदाळे, अमित कांबळे, उज्वला कदम, संतराम पाटील, भारत पाटील, अशोक पाटील, संग्राम माने, मोहन पाटील, केरबा पाटील, दत्तात्रय पाटील, लता कांदळकर, सरदार पाटील, वसंत कांबळे, राजेंद्र देशमाने, भीमराव देसाई, चंद्रकांत बागडी, पांडुरंग पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले.
मागण्या
- शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा
- कामगारविरोधी कायदे रद्द करून कंत्राटीकरण थांबवा
- लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीजबिले माफ करा
- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या
- नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान द्या
- एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत एकरकमी बिल द्या