'सह्याद्री एक्स्प्रेस' मुंबईपर्यंत स्वप्नच... खडकीपर्यंतच धावणार; हजारो प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:08 IST2026-04-10T14:08:05+5:302026-04-10T14:08:23+5:30
'दादर-रत्नागिरी' रेल्वेबाबतच्या निर्णयामुळे प्रवासी नाराज होते. त्यातच सह्याद्री एक्स्प्रेसच्या मार्गातील बदलामुळे मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी आणखी वाढली आहे.

'सह्याद्री एक्स्प्रेस' मुंबईपर्यंत स्वप्नच... खडकीपर्यंतच धावणार; हजारो प्रवाशांची गैरसोय
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: बहुचर्चित सह्याद्री एक्स्प्रेसच्या मार्गात रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी बदल केला आहे. पूर्वी कोल्हापूरहून थेट मुंबईपर्यंत धावणारी ही गाडी आता फक्त पुण्याजवळील खडकी स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे ही गाडी मुंबईपर्यंत धावण्याचे आता दिवास्वप्नच राहणार आहे.
कोल्हापूर ते पुणे धावणारी (क्रमांक ११४१९/२०) ही विशेष गाडी आता मध्य रेल्वेने कोल्हापूर-खडकी एक्स्प्रेस म्हणून सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात 'झिरो टाइम टेबल' अंतर्गत ही गाडी बंद केली होती. आता ती पुन्हा सुरू झाली असली तरी तिचा पूर्वीचा मुंबईपर्यंतचा मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आता खडकी किंवा पुणे येथे उतरून पुढील प्रवास करावा लागेल. वेळ, खर्च वाढण्याची शक्यता असून प्रवाशांची गैरसोय होईल. कोल्हापूर मुंबई रेल्वे प्रवासाची सोय कमी झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल होणार असून, रेल्वे प्रशासनाने हा निर्णय पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.
पनवेल मार्गे मुंबईपर्यंत सुरू ठेवा
दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटना आणि नागरिकांनी ही गाडी पनवेलमार्गे मुंबईपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांना मोठा फटका
कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. थेट प्रवासाची सोय बंद झाल्याने आता प्रवाशांना पुणे किंवा खडकी येथे उतरून पुढील प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे वेळ, खर्च आणि त्रास वाढणार आहे.
आधीच नाराजी, त्यात भर
अलीकडेच 'दादर-रत्नागिरी' रेल्वेबाबतच्या निर्णयामुळे प्रवासी नाराज होते. त्यातच सह्याद्री एक्स्प्रेसच्या मार्गातील बदलामुळे मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी आणखी वाढली आहे.
अलीकडेच दादर-रत्नागिरी रेल्वे संदर्भातील निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. त्यातच सह्याद्री एक्स्प्रेसच्या मार्गातील बदलामुळे नाराजीत आणखी भर पडली आहे. - मोहन शेटे, रेल्वे अभ्यासक, कोल्हापूर.