Kolhapur Politics: कार्यकर्ते गेले दूर, रेडिमेड नेत्यांचीही आता सोडचिठ्ठी; राजू शेट्टींनी काय मिळवले..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:34 IST2025-02-26T12:34:31+5:302025-02-26T12:34:42+5:30
कार्यकर्त्यांनी काय दगडेच मारायची का..

Kolhapur Politics: कार्यकर्ते गेले दूर, रेडिमेड नेत्यांचीही आता सोडचिठ्ठी; राजू शेट्टींनी काय मिळवले..?
शरद यादव
कोल्हापूर : हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी अखेर स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीत प्रवेश देऊन तिकीट देणारे राजू शेट्टी यांना जवळच्या कार्यकर्त्यांचा रोष पत्कारावा लागला होता. या निर्णयाला विरोध करत वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीतून बाहेर पडत तोफ डागली होती. ज्या मिणचेकरांसाठी संघटनेत भगदाड पडले ते हातात धनुष्यबाण घेणार असतील तर शेट्टी यांनी यातून मिळवले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकारणाच्या बेरीज - वजाबाकीत चळवळीच्या गळ्याला नख लावले जात असल्याने शेतकऱ्यांचा आवाज क्षीण होत असल्याचे कटु वास्तव समोर येत आहे.
शरद जोशी यांनी लावलेल्या शेतकरी संघटनेच्या रोपट्याला यशाची फळे आणण्यासाठी ज्यांनी काम केले त्यात राजू शेट्टी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. २००३ नंतर पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी संघटनेने झंझावता तयार केला होता. ऊस दराचे अर्थकारण सोप्या भाषेत मांडत साखर कारखानदारांचे वाभाडे काढण्याचे काम स्वाभिमानीने केले. यामुळेच उसाला चांगला दाम मिळाला, दुधाचे दरही वधारले, शेतकऱ्यांच्या जीवनात चार सुखाचे दिवस आले. यामुळेच शेतकऱ्यांनीही आपला आवाज म्हणून राजू शेट्टी यांना जिल्हा परिषद, विधानसभा व्हाया लोकसभेत पाठवून कामाची पोचपावती दिली.
२००९ व २०१४ मध्ये शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले; पण शेतकऱ्यांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविल्याने विरोधकांचा प्रयत्न तोकडा पडला. जो पैलवान मातीत हारत नाही त्याला हातात हात देऊन पाडायचे असते, असे सांगितले जाते. २०१९ मध्ये शेट्टींना महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने मातीत न हारणारा शेतकरी योद्धा हातात हात देऊन पराभूत झाला. येथूनच स्वाभिमानीचे बुरे दिन सुरू झाले.
गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वबळ आजमावत शेट्टींनी पुन्हा शेतकऱ्यांना साद घातली; परंतु ‘बुंद से गये ओ हौदासे नही आता’ या न्यायाने लोकांनी त्यांना नाकारले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे राबणारे वैभव कांबळे यांना ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवून शिवसेनेतून आलेले मिणचेकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज हाेऊन वैभव कांबळे बाहेर पडले. विधानसभेला मिणचेकरांचा पराभव झाला व कांबळे यांनीही संघटना सोडली. या सर्व राजकारणातून शेट्टी यांनी मिळवले काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.
तिकिटासाठी हे आले अन् गेले
भारत भालके, संजय घाटगे, दत्ता घाटगे, मनोज घोरपडे, अमर यशवंत पाटील, विशाल पाटील, प्रमोद कदम व आता सुजित मिणचेकर यांनी निवडणुकीपुरता संघटनेचा बिल्ला छातीवर लावला व नंतर तो कधी काढला हे शेट्टींनाही कळले नाही.
कार्यकर्त्यांनी काय दगडेच मारायची का..
करपलेल्या चेहऱ्याच्या कार्यकर्त्यांना संधी देणार, असे उठता बसता सांगणारे शेट्टी प्रत्यक्षात तसे वागतात का, याचे चिंतन करावे. कारण एक कार्यकर्ता तयार व्हायला दहा वर्षे लागतात. या विधानसभा निवडणुकीत जालंधर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील यांनी स्वाभिमानीशी फारकत घेतली. ज्यांना निवडणुकीसाठी आयात केले तेही सोडून जात असतील कष्टकऱ्यांची ही चळवळ वाढवणार कोण याचे उत्तर शेट्टी यांनीच द्यावे.